जमीन खरेदी करायला निघालेल्या व्यक्तीची ११ लाख ५० हजारांची चोरी, यवत जवळील घटना

दौंड : दौंड तालुक्यातील यवत येथे असणाऱ्या एका हॉटेलजवळ ट्रॅव्हल बस थांबल्यानंतर एका व्यक्तीच्या बॅग मधील ११ लाख ५० हजार रुपयांची चोरी करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत कोम्मीनेनी श्रीनिवास राव (वय ४४, व्यवसाय हॉटेल, घनसोली, मुंबई) यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे जमीन खरेदी करण्यासाठी ११ लाख ५० हजार रुपये घेऊन वाशी ते विजयवाडा आंध्रप्रदेश असा प्रवास करीत होते. त्यावेळी त्यांचे वाहन यवतच्या कासुर्डीजवळ असणाऱ्या हॉटेल दिल्ली दरबार समोर असेलेल्या रस्त्याला लगत असताना ही घटना घडली आहे.

या प्रवासादरम्यान फिर्यादी यांच्याजवळ असलेल्या पिवळ्या रंगाच्या प्रवासी बॅग मधील सुमारे ११ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करुन नेली असल्याने फिर्यादी राव यांनी फिर्याद दिल्याने यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.