अख्तर काझी
दौंड : प्रेमसुख कटारिया व त्यांच्या कुटुंबीयांनी या शहराची मोठी सेवा केली आहे, या शहरामध्ये विकासाची जी कामे चालू आहेत त्यामध्ये प्रेमसुख कटारिया यांचा मोठा वाटा आहे अश्या शब्दांत आमदार राहुल कुल यांनी प्रेमसुख कटारिया यांच्याबाबत गौरोवोद्गार काढले.

दौंड येथील अकबर सय्यद मित्र मंडळाच्या वतीने प्रेमसुख कटारिया यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्या मध्ये राहुल कुल बोलत होते. यावेळी मा. पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, मा.नगरसेवक बबलू कांबळे, नंदू पवार, अकबर सय्यद आदींसह मोठ्याप्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते.
आ.राहुल कुल म्हणाले की, दौंड शहर सुंदर व्हावे, येथील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात असा प्रयत्न प्रेमसुख कटारिया यांचा सतत राहिला आहे. शहराला एक चांगले स्वरूप देण्याचा त्यांचा कायम प्रयत्न राहिला आहे. दिवस-रात्र सेवा करताना तुमच्या पासून माझ्यापर्यंत सगळ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून मदत करण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले आणि म्हणूनच आपण त्यांचा वाढदिवस एक प्रकारे त्यांचे आपल्यावर असणारे ऋण व्यक्त करण्याची संधी म्हणून आपण वाढदिवस साजरा करून व्यक्त करत असतो. त्यांच्या सदिच्छा नेहमीच आपल्या पाठीशी राहिलेल्या आहेत.
शेठजींना शुभेच्छा व्यक्त करीत असताना 79 व्या वर्षीही त्यांचे आरोग्य चांगले आहे, त्यांनी शंभरावी साजरी करावी आणि आयुष्याचे शतक पूर्ण करावे अशा आपणा सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा देत आहे. त्यांना आयुर्मान लाभले की आपल्या सर्वांना सुद्धा त्यांच्या हातून आपली कामे मार्गी लागण्याचा योग यावा अशा प्रकारच्या ही हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो असे राहुल कुल म्हणाले. अकबर सय्यद मित्र मंडळाच्या वतीने यावेळी अन्नदानाचा उपक्रमही राबविण्यात आला.








