दौंड : दौंड मतदारसंघातील दळणवळणाला नवी गती देणारा आणि पूर्व भागाचा चेहरामोहरा बदलणारा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे. मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांच्या मजबुतीकरण व रुंदीकरणासाठी आशियाई विकास बँक (ADB) अंतर्गत सुमारे २४० कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे. जुलै २०२६ च्या पावसाळी अधिवेशनातील पुरवणी अर्थसंकल्पात या निधीला मंजुरी मिळाली असून, आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यामुळे मोठे यश आले आहे.
दौंड मतदारसंघातून जाणाऱ्या एकूण ३० किलोमीटर लांबीच्या आणि खराब झालेल्या प्रमुख जिल्हा मार्गांचा (प्रजिमा) यात समावेश आहे. यामुळे दोन प्रमुख टप्प्यांचे काम केले जाईल: टप्पा १ (आलेगाव ते मलठण): आलेगांव-बोरीबेल-मलठण-स्वामी चिंचोली ते राष्ट्रीय महामार्ग ९ ला मिळणारा रस्ता व व टप्पा २ (मलठण ते भिगवण स्टेशन): मलठण-राजेगाव-भिगवण स्टेशन-भिगवण ते राष्ट्रीय महामार्ग ९ ला जोडणारा रस्ता अशी कामे होणार आहेत.
सध्या हे रस्ते अरुंद आणि खड्ड्यांमुळे खराब अवस्थेत असल्याने स्थानिक नागरिकांना, शेतकऱ्यांना आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. हा मार्ग दौंडच्या पूर्व भागातून थेट पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गाशी जोडणारा मुख्य दुवा आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दौंड मतदारसंघातील आलेगाव, बोरीबेल, काळेवाडी, मलठण, राजेगाव आणि इंदापूर तालुक्यातील भिगवण स्टेशन व भिगवण ही गावे एकमेकांशी थेट जोडली जाणार आहेत. हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर या भागातील शेतकऱ्यांचा शेतीमाल बाजारपेठेत पोहोचवणे अधिक गतिमान होईल.
तसेच, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आणि रुग्णांना तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी पुणे-सोलापूर हायवेवरून मोठ्या शहरांमध्ये जाणे अत्यंत सोपे आणि सुरक्षित होणार आहे. या रस्त्यांच्या रुंदीकरणामुळे परिसराच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
दौंडचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय — आमदार राहुल कुल
“दौंड मतदारसंघातील पूर्व भागातील नागरिकांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. खराब रस्त्यांमुळे होणारा त्रास आता कायमचा दूर होणार आहे. या महत्त्वपूर्ण कामासाठी २४० कोटींचा निधी दिल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा ऋणी आहे. या कामाचा दर्जा उत्तम राखून ते वेळेत पूर्ण करण्यावर आमचा भर असेल.”






