अब्बास शेख
दौंड : दौंड तालुक्यात पक्ष नसून कुल आणि थोरात असे दोन गट आहेत आणि प्रत्येक निवडणुकीत हे दोन गट एक दुसऱ्याच्या समोर उभे ठाकलेले दिसत असतात. येथे ना कोणता पक्ष चालतो ना अन्य तिसऱ्याला घुसण्याची संधी मिळते येथे चालतो तो फक्त ‘कुल आणि थोरात’ ब्रँड आणि या मागे आहे दौंड तालुक्यातील जनतेचे योगदान.
आत्ता चालू घडामोडीमध्ये दोन निवडणूका झाल्या. एक होती आमदारकी ज्यावर आमदार राहुल कुल यांनी निर्विवाद वर्चस्व मिळवले तर दुसरी निवडणूक झाली जिल्हा परिषद, पंचायत समितीची ज्यावर थोरात गटाने आपले पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. या निवडणुकांमध्ये जनतेचे चातुर्य दिसून आले. आमदार म्हणून त्यांना राहुल कुल हेच हवे असे त्यांनी आपल्या मतदानातून यावेळीही दाखविले तर खालची मंडळी नाकारत थोरात गटाला मात्र झुकते माप देत गावपातळीवरील समीकरणे बदलून ठेवली.
सध्या दौंड तालुक्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवरून चांगलेच वातावरण तापल्याचे दिसत आहे. १२४ सोसायट्या असलेल्या या तालुक्यात आता सोसायटी प्रतिनिधी निवडीवरून मोठी रस्सीखेच होत असल्याचे दिसत आहे. हा सर्व प्रकार पाहून २००७ आठवण झाल्याशिवाय राहत नाही. त्यावेळी ज्या घडामोडी घडल्या होत्या त्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडण्याचा पाया रचला गेला होता आणि त्यानंतर २००९ वगळता या तालुक्यावर राष्ट्रवादीचा आमदार निवडून गेला नाही.
काय घडले होते २००७ साली –
२००७ साली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले होते. मात्र त्यावेळचे पीडिसीसी बँकेचे संचालक रमेश थोरात हे २००४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षामध्ये सामिल झाले होते. हे सर्व होत असताना भीमा पाटसचे अध्यक्ष राहुल कुल यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा असा राष्ट्रवादी पक्षाकडून वरिष्ठांकडून आदेश आला आणि त्यांनी जोरदार तयारी सुरु केली. आमदार राहुल कुल यांनी त्यावेळी मोठ्या प्रमाणावर सोसायट्यांच्या प्रतिनिधिंची जमवाजमव करत थोरात गटाला हैरान केले होते. हे सर्व होत असताना ऐनवेळी रमेश थोरात आणि अजितदादा पवार यांची गुप्त बैठक झाली. त्यानंतर थोरातांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि संपूर्ण चित्रच बदलून गेले. त्यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कुल आणि थोरात यांचा एकत्र बैठक घेऊन समेट घडविण्याचे प्रयत्न केले आणि रमेश थोरात यांना ‘अ’ तर राहुल कुल यांना ‘ब’ या गटातून बिनविरोध संचालक म्हणून घोषित केले.
मात्र राहुल कुल यांनी त्यावेळी केलेली जमवाजमव आणि घेतलेली मेहनतीचे रूपांतर ‘सामोपचारात’ झाल्याने राहुल कुल यांच्यासह कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यामुळे अजितदादा पवार आणि कुल गटात थोडी नाराजीची दरी निर्माण झाली. अजितदादांना कुल गटाने विनंती केली होती की फक्त एकदा जिल्हा बँकेची समोरासमोर निवडणूक होऊ द्या. आमच्या मेहनतीचे चीज होऊ द्या. मग तुम्ही द्याल तो निर्णय आम्हाला मान्य राहील मात्र तसे घडले नाही आणि कुल, थोरात हे २००७ ते २०१४ असे जिल्हा बँकेवर संचालक म्हणून राहिले.
आता २०२६ चालू असून आताही तशीच काहीशी ‘काटे की टक्कर’ ची परिस्थिती पहायला मिळत आहे. यावेळी रमेश थोरात हे राष्ट्रवादी तर राहुल कुल हे भाजप पक्षात आहेत. मात्र दोन्ही गटांनी आता आपले सोसायटी प्रतिनिधी कसे जास्त जातील याचा प्रयत्न सुरु केला आहे. या सर्व घडामोडीमध्ये कुल गटाने जोरदार ताकत लावल्याचे दिसत आहे. अनेक सोसायटिंचे प्रतिनिधी पाठविण्यास कुल गटाला यश येत असून थोरात गटानेही कंबर कसत आपले जास्तीत जास्त प्रतिनिधी पुढे कसे पाठवता येतील यावर फोकस केला आहे. २२ सप्टेंबर नंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीची तारीख जाहीर होईल आणि कुणाचे किती प्रतिनिधी जातात यावरून निकाल काय असेल हेही स्पष्ट होईल.







