देशातील परीक्षा व्यवस्था होणार अधिक पारदर्शक, केंद्राकडून ‘हाय पॉवर टास्क फोर्स’ ची स्थापना

नवी दिल्ली | प्रतिनिधी

देशातील परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जागतिक कीर्तीचे तंत्रज्ञानतज्ज्ञ नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय हाय पॉवर टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षा प्रक्रियेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यापक सुधारणा घडवून आणणे, तसेच परीक्षा व्यवस्थेवरील विद्यार्थी व पालकांचा विश्वास अधिक दृढ करणे हे या टास्क फोर्सचे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे.

केंद्र सरकारने यापूर्वीही नीट (NEET) पेपर लीक प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई केली असून, परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी अधिक कडक कायदेशीर तरतुदी आणि सक्षम यंत्रणा उभारण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. भविष्यात कोणत्याही प्रकारच्या पेपरफुटी किंवा गैरव्यवहाराला वाव मिळू नये, यासाठी तांत्रिक तसेच प्रशासकीय पातळीवर व्यापक सुधारणा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्ता, प्रामाणिकपणा आणि समान संधी यांवर आधारित परीक्षा व्यवस्था उपलब्ध करून देणे हा मोदी सरकारचा स्पष्ट संकल्प असल्याचे केंद्र सरकारने अधोरेखित केले आहे. युवा भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी घेतलेल्या या दूरदृष्टीपूर्ण निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, परीक्षा व्यवस्थेत विश्वासार्हता आणि पारदर्शकता वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.