दौंडमध्ये चाललंय काय, आमदार साहेब तुम्हाला नक्की हवय काय..!

तालुका वार्तापत्र – अब्बास शेख

दौंड : संपूर्ण राज्यात आणि त्यातल्या त्यात पुणे जिल्ह्यात सुद्धा आता क्राईमच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सध्या वेगळे वातावरण पहायला मिळत आहे. जातीवादी लिखाण, चिथावणीखोर पोस्ट, भडकावू वक्तव्ये, मारहाण, दुराचार आणि महिला, मुलींवर होणारे अत्याचार रोज पहायला मिळत आहेत. मात्र काही ठराविक प्रकरणांमध्ये पोलिस यंत्रना सुद्धा मूग गिळून का गप्प बसते हे न उलगडणारे कोडे म्हणावे लागेल. हे झालं इतर तालुक्यांचं तसाच प्रकार दौंड तालुक्यात सुद्धा करण्याचा प्रयत्न केला जात आहे का..?? असा जर कुणी प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर ‘होय’ असे असेल यात शंका नाही मात्र मग येथे नेमके काय घडतेय आणि कशापद्धतीने येथील परिस्थिती हाताळली जातेय याचा आढावा आता घ्यावा लागेल.

तर दौंड तालुका हा तसा विविध जाती, धर्मातील लोकांना बरोबर घेऊन एकत्रपणे विकास साधणारा तालुका अशी याची ओळख आहे. येथील आजी, माजी आमदार हे सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालतात हि सुद्धा येथील जमेची बाजू असून त्यामुळे विविध जाती धर्माचे लोक मनात कोणतीही भीती न बाळगता याठिकाणी आपले रोजगार, व्यवसाय आणि शेतीवाडी करताना दिसतात. मात्र सध्या भोवताली जे वातावरण सुरु आहे त्याचा परिणाम येथेही पहायला मिळत आहे.

या तालुक्यातही काही भावना भडकवणारे मेसेज, पोस्ट, वक्तव्य, क्राईमच्या घटना होताना दिसत आहेत. या ठिकाणीही याला धार्मिक, जातीय रंग देण्यात येऊन वातावरण बिघडण्याच्या घटना समोर आल्या आहेत. मग तरीही जे इतर ठिकाणी घडते ते या ठिकाणी का घडत नाही याचा मागोवा घेतला तर एक बाब प्रकर्षाने समोर येते ती म्हणजे कोणत्याही प्रकारची बिकट परिस्थिती उद्भवली तरी ती व्यवस्थित हाताळण्याची कसब. मग ती जातीय तेढ असो किंवा गुन्हेगारी कृत्ये असो की शेती आणि पाण्याविषयी आलेली अडचण असो सर्व बाबी व्यवस्थित हाताळल्या गेल्याने परिस्थिती आटोक्याबाहेर जात नाही हि या तालुक्याची जमेची बाजू आहे.

प्रत्येक घटनेकडे प्रत्येकाचा पाहण्याचा आपला दृष्टिकोन असतो ज्याला कुणी बदलू शकत नाही त्यामुळे काहींना या घटनांवरील लिखाण हे चापलुसी वाटेल किंवा काहींना हे पेड वाटेल मात्र जर व्यवस्थितपणे डोळे उघडे ठेवून पाहिले आणि विचार केला तर नक्कीच जाणवेल की एक भयान संकट दारापर्यंत येऊन ठेपले आहे मात्र त्याला आत येऊ न देण्यासाठी जी यंत्रणा दिवसरात्र राबतेय त्यात सर्वात जास्त ऊर्जा हि विद्यमान आमदारांची खर्च होत आहे. तालुक्यात खरंच एखाद्यावर अन्याय झाला, गुन्हा घडला तर आरोपीवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होत आहे. कार्यकर्ता कुणाचाही असो त्याला न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावेच लागत आहे हि लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय जमेची बाजू मानावी लागेल मात्र कृत्य एकाचे आणि यातना सर्व समाजाला हेही येथे मान्य केले जात नाही.

येथे कायदा आणि सुव्यवस्था जपण्याचे काम केले जाते. व्यक्ती कितीही जवळचा असला आणि चुकला तर त्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते हे काल परवाच्या घटनांवरून पुन्हा एकदा पुढे आले आहे. पत्रकारांना लिखानातुन हवे ते मांडता येते कोणती रोकटोक नाही. बऱ्याचदा नेत्यांची बदनामी होते, विनाकारण नको त्या प्रकरणात नाव जोडून मिडिया ट्रायल होते मात्र तरीही कुणाच्या बोलण्यावर आणि लिखान स्वातंत्र्यावर गदा येत नाही हे या तालुक्यातील लोकशाहीचे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. आजूबाजूला अत्यंत बिकट आणि भयानक परिस्थिती उद्भवलेली असताना दौंड तालुक्यात मात्र आजही कायद्याचे राज्य आहे. येथे चुकीला चुक आणि बरोबरला बरोबर म्हटले जातेय.

कोण कोणत्या जातीचा हे न पाहता फक्त त्याचे कृत्य आणि त्यावर झालेली कारवाई पहायला मिळत आहे. त्यामुळे अतिशय भयानक आणि बिकट परिस्थिती असताना, दूषित वातावरण झालेले असताना सर्वांना सोबत घेऊन जाताना जी तारेवरची कसरत करावी लागत आहे ते पाहता आमदार साहेब तुम्हाला नक्की हवे तरी काय..? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला नक्कीच पडत आहे. तर कायदा, सुव्यवस्थेचे राज्य आणि सर्वांना सोबत घेऊन होणारा तालुक्याचा विकास हे पाहिजे असे उत्तर आमदारांकडून ऐकायला मिळत आहे. त्यामुळे काहींचा रोष पत्करून आणि नको ते आरोप सहन करुन सुद्धा आज तालुक्याची धुरा समर्थपणे सांभाळली जात असल्याचे नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे.