तरंच कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा होणार

मुंबई | प्रतिनिधी

राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) वेगाने सुरू असून २८ जुलै २०२६ पर्यंत राज्यातील ३.९६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. अशी माहिती सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली.

दीपक तावरे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांना देय असलेल्या कर्जमाफीची रक्कम निश्चित करण्यात येईल. त्यानंतर ही रक्कम थेट लाभ वितरण (Direct Benefit Transfer – DBT) पद्धतीने संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा केली जाणार आहे.

कर्जमाफीचा लाभ कोणत्याही अडथळ्याशिवाय व पारदर्शकपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे अद्यापही ज्या पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही, त्यांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन सहकार विभागाने केले आहे.

सहकार विभागाकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका तसेच संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू असून, उर्वरित पात्र शेतकऱ्यांनीही वेळेत प्रक्रिया पूर्ण करून कर्जमाफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी स्पष्ट केले की, आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरच कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात मंजूर रक्कम डीबीटीद्वारे थेट जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांनी विलंब न करता आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे त्यांनी म्हटले आहे.