मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’मधील लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेला लाभ शासनाकडून सक्तीने परत घेण्यात येत आहे अथवा घेण्यात येणार असल्याबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांमुळे महिला वर्गात काहीशी नाराजी दिसत आहे, मात्र आता खुद्द शासनानेच याचा खुलासा करत वस्तुस्थिती समोर आणली आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेला लाभ शासनाकडून सक्तीने परत घेण्यात येत असल्याचे किंवा घेण्यात येणार असल्याबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या ह्या वस्तुस्थितीला धरून नाहीत, असे स्पष्टीकरण आता महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी दिले आहे.
यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेमध्ये काही लाभार्थी महिला योजनेच्या अटी व शर्तीनुसार अपात्र ठरत असल्याने स्वेच्छेने त्या लाभाची रक्कम परत करत आहेत. तसेच ज्या महिलांकडून पुढील कालावधीतील लाभ नको असल्याबाबत स्वेच्छेने कळविण्यात येत आहे, अशा महिलांना त्यांची विनंती विचारात घेऊन लाभ देण्यात येत नाही. लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत कोणतीही सक्ती शासनाकडून करण्यात येत नाही, असे स्पष्टीकरणही महिला व बालविकास विभागाचे सचिव यादव यांनी दिले आहे.