IT विभागाची सलग दुसऱ्या दिवशीही छापेमारी सुरूच… ‛ढगात गोळ्या मारू नका’ ! लवकरच ‛दूध का दूध’, ‛पाणी का पाणी’ होईल : उपमुख्यमंत्री अजित पवार



पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असणाऱ्या अनेकांच्या कारखान्यांवर आणि ऑफिसेसवर  राज्यात अनेक ठिकाणी आयकर विभागाने छापेमरी केल्याने राज्यात एकच खळबळ माजली आहे. विशेष आज शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही राज्यात काही ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली असून यात पार्थ पवारांच्या निकट असणाऱ्या नंदुरबार येथील एका कारखान्यावर सलग दुसऱ्या दिवशीही छापा टाकण्यात आला आहे.

विविध माध्यमांतून उलट सुलट बातम्या येत असताना आता या सर्व प्रकरणावर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी सध्याच्या छापेमारी आणि आयकर विभागाच्या हाती काही महत्त्वाचे लागले असल्याच्या प्रश्नावरून ‛कुणी ढगात गोळ्या मारू नका’ ! लवकरच ‛दूध का दूध’ आणि ‛पाणी का पाणी’ होईल असे उत्तर दिले आहे. ते मावळ येथील एका कार्यक्रमात आले असता त्यांनी हि प्रतिक्रिया दिली आहे.

काल दिवसभर आयकर विभागाने पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे मारले होते. हे छापे अजित पवारांच्या निकटवर्तीय असणाऱ्या लोकांच्या कारखान्यांवर आणि त्यांच्या बहिणींच्या घरीही मारण्यात आले होते. 

या सर्वांमुळे अजित पवारांनी तिखट प्रतिक्रिया दिली होती तर राष्ट्रवादीचे  सर्वेसर्वा शरद पवार यांनीही यावर तीव्र प्रतिक्रिया देताना यूपी मध्ये शेतकऱ्यांवर जो हल्ला झाला त्या प्रश्नावर आम्ही जी भूमिका मांडली त्यावर नाराज होऊन सूडबुद्धीने यांनी सुरू केले असावे असे सांगितले.