महाराष्ट्र सदन पुतळा प्रकरण | आता आ.गोपीचंद पडळकर गप्प का..? जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांचा सवाल

सुधीर गोखले

सांगली : दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवल्याप्रकरणी काँग्रेस पक्ष आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. आज सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाचे नेते सुभाष खोत यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा निषध नोंदवला आहे.

नेते सुभाष खोत यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हणले आहे, कि आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा निषेध करत आहोत. असाच निषेध आता धनगर समाजाचे नेते म्हणवणारे आ. गोपीचंद पडळकर करणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. प्रसिद्धी पत्रकात पुढे त्यांनी म्हणले आहे कि काल स्वा. सावरकरांची जयंती भारत भर साजरी झाली. महाराष्ट्र सदनामधेही साजरी झाली. त्याचे आम्ही स्वागत करतो.

पण ते साजरी करत असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय साध्य केलं. त्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी या दोन्ही महान व्यक्तींचा अपमान केला आहे. नेहमी आ. गोपीचंद पडळकर राज्यभरातील नेत्यांवर आगपाखड करत असतात. आता पुतळे हटवल्यानंतर पडळकर गप्प का ? असा सवालही त्यांनी उपस्थित करत आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो असे त्यांनी म्हटले आहे.