सत्तेत येण्यासाठी तुम्ही बेईमानी केली, तर.. तुमचे अर्धे मंत्री जेलमध्ये असते..! आता सरकार चालवून दाखवाच – देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

नागपूर :   काल दसरा मेळाव्यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जी टीका केली त्यास आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही जनमताशी बेइमानी करून सत्तेत आला आहात, तुम्ही सरकार चालवून तर दाखवा असे आव्हानच देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.

त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांच्या राज-उद्धव या भावंडांतील जुनी जखम चिघळवत तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, तर राज ठाकरे यांनी पक्ष का सोडला असा सवाल उपस्थित करून सुभाष देसाई, संजय राऊत हे शिवसेनेचे जुने दिग्गज असताना त्यांना डावलून तुम्ही मुख्यमंत्री का झाले असा प्रति हल्ला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चढवला आहे.

यावेळी फडणवीस यांनी नारायण राणे यांचा संदर्भ देताना त्यांना पक्षातून बाहेर का काढलं याच उत्तर आहे का प्रश्नही उपस्थित करुन आता मान्य करा की आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून हे सर्व डावलले गेले असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भाजपला हिम्मत असेल तर समोर येउन लढा असे ईडी, सीबीआय च्या मागे लपू नका असे आव्हान दिले होते.

यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ईडी, सीबीआय येणाचे कारण तुमचे अनेक मंत्री भ्रष्टाचारी आहेत त्यामुळे ते येत आहेत ईडी, सीबीआयला न्यायालयाने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मोदी सरकार ने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला नाही जर त्यांनी त्यांचा वापर केला असता तर तुमचे अर्धे मंत्री आत्तापर्यंत जेलमध्ये असते असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.