CJP आंदोलन, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, युवकांना भावनिक पत्र

नवी दिल्ली |

NEET-UG 2026 परीक्षेतील कथित अनियमितता आणि त्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्यासोबत त्यांनी देशातील युवकांना उद्देशून एक भावनिक खुले पत्रही प्रसिद्ध केले आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर देशभरात विविध राजकीय पक्ष, विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संघटनांकडून  आता यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

दरम्यान, CJP च्या युवा आंदोलनाला मोठे यश मिळाल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे. शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता, विद्यार्थ्यांना न्याय आणि जबाबदारी निश्चित करण्याच्या मागण्यांसाठी CJP च्या युवा कार्यकर्त्यांनी सातत्याने आंदोलन छेडले होते. या आंदोलनाचा परिणाम म्हणून हा राजीनामा झाल्याचा दावा संघटनेकडून करण्यात आला आहे.

पत्रात धर्मेंद्र प्रधान यांनी गेली चार दशके शिक्षण क्षेत्रासाठी कार्य केल्याचा उल्लेख करत, विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण सुधारणांसाठी आपण कायम समर्पित राहिलो असल्याचे म्हटले आहे. ३ मे २०२६ रोजी झालेल्या NEET-UG परीक्षेत अनियमितता समोर आल्यानंतर सरकारने तातडीने CBI चौकशीचे आदेश दिले, परीक्षा रद्द करून पुनर्परीक्षा घेतली आणि पुढील वर्षापासून संगणक-आधारित (CBT) पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे.

पत्रात त्यांनी सुमारे २० लाख विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत पुनर्परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्यात केंद्र, राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, पालक आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभल्याचे नमूद केले आहे.

मात्र, गेल्या काही दिवसांतील घडामोडींमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न झाल्याने मन व्यथित झाल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. देशातील युवकांची स्वप्ने आणि भविष्य कोणत्याही राजकीय किंवा कायदेशीर वादात अडकू नये, यासाठी आपण पंतप्रधानांकडे राजीनामा सादर केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.