मुख्यमंत्री शब्द पडू देईनात, ‘कुल’ बनले ‘पॉवर फुल’

राजकीय वार्तापत्र – अब्बास शेख

दौंड : तुमची सत्ता नसेल आणि तरीही तुम्ही तुमच्या तालुक्यातील, जिल्ह्यातील कामे मार्गी लावण्यासाठी धडपड करत असाल आणि ती कामे मार्गी लागत असतील तर त्याला त्या व्यक्तीचे कौशल्य समजले जाते. मात्र जर सत्ताच हातात आली तर मात्र त्या कौशल्याचे रूपांतर हे विकासात्मक धोरणे आखून त्याच्या पूर्तीकडे होत जाणे हे त्या व्यक्तीचे मंत्रालयात असलेले विशेष स्थान अधोरेखित करते.

असाच काहीसा प्रकार दौंड तालुक्यासोबत घडत असून दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यावर मुख्यमंत्री साहेबांचे असलेले विशेष प्रेम आणि पाठिंब्याचा फायदा हा नुसता दौंड तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याला होऊ लागला आहे. आमदार राहुल कुल यांचा स्वभाव सर्वश्रुत आहे. जे योग्य असेल, न्याय देईल आणि कायम खंबीरपणे पाठीमागे उभे राहिल अश्या सोबत त्यांचे ऋणानुबंध घट्ट होत जातात. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास आमदार राहुल कुल यांनी केव्हाच जिंकल्याने त्यांचे कुल यांच्यावर विशेष प्रेम आहे हे संपूर्ण राज्याला माहित आहे. मात्र या प्रेमाचा स्वतःच्या स्वार्थासाठी गैरफायदा न घेता जनतेची गरजेची असलेली कामे मार्गी लावण्यासाठी राहूल कुल यांनी त्या संबंधांचा विशेष उपयोग करुन घेतला असल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात ऐकायला मिळत आहे.

मुळशीचे पाणी, खडवासला टनेल, हडपसर ते यवत उन्नत महामार्ग, बेबी कॅनॉल, महावितरण यंत्रणा, रस्ते अश्या अनेक महत्वाच्या गरजा दौंड तालुका आणि पुणे जिल्ह्यातील जनतेसाठी आमदार कुल यांच्या विशेष मागणीने पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करु लागल्या आहेत. राज्यात पाण्याचे दुर्भीक्ष जाणवू लागले असून अनेक ठिकाणी पिके जळून जात असताना बेबी कॅनॉल च्या माध्यमातून पाणी मिळाल्याने पाण्याच्या दुर्भीक्षामुळे जळून जाणारी पिके तरारताना पहायला मिळत आहे.

आमदार राहुल कुल यांचा कोणताच शब्द मुख्यमंत्री पडू देत नाहीत असे उद्गार अनेक मंत्री महोदय सुद्धा काढताना दिसत आहेत. पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या सर्वात जवळचा चेहरा म्हणून राहुल कुल यांना ओळखले जाऊ लागले आहे त्यामुळे कसलेही काम असो मुख्यमंत्री महोदय कुल यांना झुकते माप देतात हे आता कुणाच्याही नजरेतून सुटत नाही. केवळ तालुक्याचा विचार न करता संपूर्ण जिल्ह्याचा विचार कुल करत असल्याने त्यांच्या जिल्ह्यासाठी असलेल्या विशेष मागण्या ह्या कधीच रद्द होत नाहीत तर विशेष बाब म्हणून त्वरित मंजूर केल्या जातात ही मुख्यमंत्री आणि कुल यांच्यामध्ये असलेल्या अतूट विश्वासाची कडी समजली जात आहे.