अब्बास शेख
पुणे : पुणे जिल्हा नियोजन समितीची महत्त्वाची बैठक राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. नामदार श्रीम. सुनेत्राताई पवार यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणाली (ऑनलाईन) द्वारे संपन्न झाली. या बैठकीत आमदार राहुल कुल यांनी दौंड मतदारसंघासह संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, शेती, क्रीडा आणि दळणवळणाच्या प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरत विविध मागण्यांचा धडाका लावला. या बैठकीत जिल्ह्याच्या अंतिम विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली.
आमदार राहुल कुल यांच्या मागण्या – पुणे जिल्ह्याचा अद्ययावत पर्यटन आराखडा तयार करा, पुणे-सोलापूर महामार्गाच्या उन्नत मार्गाच्या कामाआधी ‘वाढीव लेन’ करावी, दौंडसह पुणे ग्रामिण मध्ये असणाऱ्या ग्रामपंचायत इमारती, स्मशानभूमी, अंतर्गत रस्ते आणि सामाजिक सभागृहांची कामे तातडीने मार्गी लावणे यांसह अनेक मागण्या आमदार कुल यांनी पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या ‘डीपीडीसी’ बैठकीत लावून धरल्या. तर पुणे-सोलापूर आणि पुणे-नगर महामार्गावर मंजूर झालेल्या उन्नत मार्गाचे (Flyover) काम प्रत्यक्ष सुरू करण्यापूर्वी, वाहतुकीची होणारी कोंडी टाळण्यासाठी रस्त्याच्या बाजूला तातडीने ‘वाढीव लेन’ तयार करण्यात याव्यात, अशी आग्रही आणि महत्त्वाची मागणी आमदार राहुल कुल यांनी यावेळी केली.
बैठकीत बोलताना आमदार राहुल कुल यांनी महामार्गांवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न अत्यंत गंभीरतेने मांडला. “पुणे-सोलापूर आणि पुणे-नगर महामार्गावर उन्नत मार्गाचे काम सुरू झाल्यावर वाहतुकीचा बोजवारा उडू नये, यासाठी प्रशासनाने आधीच नियोजन करून अतिरिक्त लेन तयार कराव्यात,” अशी मागणी त्यांनी केली. तसेच ग्रामीण भागाचा कणा असलेल्या ग्रामपंचायत इमारती, स्मशानभूमी, गावांतर्गत रस्ते आणि सामाजिक सभागृहांची प्रलंबित कामे प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता तातडीने मार्गी लावावीत, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांसाठीचे अपंग साहित्य वाटप आणि खेळाडूंसाठीच्या क्रीडा साहित्याची खरेदी ही ‘इ-निविदा’ व (e-Tender) प्रणालीच्या माध्यमातूनच झाली पाहिजे, जेणेकरून कामात पारदर्शकता राहील आणि दर्जेदार साहित्य वेळेत मिळेल, अशी भूमिका आमदार कुल यांनी मांडली. तसेच मंजूर झालेली सर्व विकासकामे ठरलेल्या वेळेत आणि दर्जेदार पद्धतीनेच पूर्ण झाली पाहिजेत, यात कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
पुणे जिल्ह्याला ऐतिहासिक वैभव लाभले असून, जिल्ह्याचा अद्ययावत पर्यटन आराखडा तयार करून ‘किल्ले संवर्धन विशेष मोहीम’ राबवावी, अशी मागणी त्यांनी केली. यासोबतच शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी इलेक्ट्रिक पंप मंजूर करावेत, तसेच पर्यावरण रक्षणासाठी प्रस्तावित रिंग रोड, गडकिल्ले आणि अष्टविनायक महामार्गाच्या दुतर्फा व्यापक वृक्षारोपण मोहीम राबवावी, अशा विविध विषयांवर त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
या बैठकीस जिल्ह्यातील सर्व मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनातील सर्व खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. आमदार कुल यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर पालकमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.






