आपलाच आहे कुठे जाईल असे म्हणत गृहीत धरलेल्यांना स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी दिला झटका

केडगाव, दौंड : दौंड तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायतसमितीच्या निवडणूकीत आता चांगलीच चुरस होताना दिसत आहे. ज्यांना कायम गृहीत धरले जायचे, आपलाच आहे कुठे जाईल असे संबोधले जायचे अश्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आता आपला स्वाभिमान जिवंत ठेवत नेत्यांना जोरदार झटका दिल्याचे दिसत आहे.

सध्या बोरिपार्धी – केडगाव जिल्हा परिषद गटात अभिषेक थोरात विरुद्ध तुषार थोरात अशी काटे की टक्कर पहायला मिळत आहे. कायम नेते म्हणतील तो निर्णय आणि नेत्यांचा शब्द हेच आपले सर्वस्व मानणाऱ्यांना जेव्हा गृहीत धरले जावू लागले त्यावेळी मात्र या पदाधिकाऱ्यांनी अनेक वर्षांची नेत्यांसोबत असलेली साथ सोडत आपला स्वाभिमान राखत कुल गटात प्रवेश केला आहे.

मनोज उर्फ संताजी शेळके यांच्या कुल गटातील प्रवेशामुळे निवडणुकीची रंगत अजूनच वाढली असून संताजी शेळके हे थोरात गटाचे धडाडीचे कार्यकर्ते होते. त्यांनी आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करताना भीमा पाटस चे मा.संचालक धनाजी शेळके, विद्यमान संचालक अप्पासाहेब हंडाळ, मा.संचालक किरण देशमुख, मनोज होळकर, बंडू उर्फ शिवाजी शेळके, सोमनाथ गडधे, तुकाराम शेळके, माणिक शेळके यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. संताजी शेळके यांच्या प्रवेशामुळे थोरात गट एका धडाडीच्या कार्यकर्त्याला मुकला असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून येत असून त्यामुळे केडगाव येथे कुल गटाचे पारडे आणखी जड झाल्याचे बोलले जात आहे.