अब्बास शेख
दौंड तालुका : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक रंगात येत असतानाच अजितदादांच्या अपघाती निधनाची दुःखद घटना समोर आली अण त्या दिवसापासून प्रचाराच्या तोफा थंडावल्या होत्या. आता मात्र पुन्हा एकदा उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते जोमाने प्रचाराला लागल्याचे दिसत असून या प्रचारात आमचाच उमेदवार कसा सक्षम आहे यावर अधिक भर दिला जात असून दौंड तालुक्यातील बोरिपार्धी – केडगाव, खडकी- देऊळगाव राजे आणि वरवंड- पारगाव या तीन गटांमध्ये काटे की टक्कर होताना दिसत आहे.
दौंड तालुक्यात सात जिल्हा परिषद गट आणि चौदा पंचायतसमिती गणासाठी निवडणूक होत आहे. यामध्ये प्रामुख्याने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (अजितदादा पवार) पक्ष या सत्तेतीलच दोन गटांमध्ये चुरस होताना दिसत आहे. यामध्ये सर्वात मोठी चुरस ही बोरिपार्धी-केडगाव गट, खडकी – देऊळगाव राजे गट आणि वरवंड – पारगाव गटात पहायला मिळत आहे.
बोरिपार्धी – केडगाव गटामध्ये माजी आमदार रमेश थोरात यांचे पुत्र तुषार उर्फ गणेश थोरात विरुद्ध माजी आमदार कै.काकासाहेब थोरात यांचे नातू व भीमा पाटस कारखान्याचे मा.उपाध्यक्ष आनंद थोरात यांचे पुत्र अभिषेक थोरात यांच्यात होताना दिसत आहे. या लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून यात कोण विजयी होणार याबाबत दोन्ही गटांकडून आपापली मते मांडली जात आहेत.
दुसरी सर्वात रोमहर्षक लढत ही खडकी – देऊळगाव राजे गटात पहायला मिळत असून या ठिकाणी भाजप चे आप्पासाहेब पवार विरुद्ध राष्ट्रवादी चे विरधवल जगदाळे असा सामना होत आहे. या ठिकाणी भाजप चे जेष्ठ नेते वासुदेव काळे यांच्या मुलीला ऐनवेळी उमेदवारी नाकारली म्हणून त्यांची नाराजी दिसून येत आहे तर विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या गटाने मात्र या ठिकाणी कंबर कसल्याचे दिसत असून त्यामुळे या ठिकाणी काटे की टक्कर होणार यात शंका नाही.
वरवंड – पारगाव गटातील तिसरी लढत ही आमदार राहुल कुल यांचे अतिशय विश्वासू सहकारी मानले जाणारे संजय दिवेकर यांच्या पत्नी भाजप उमेदवार सौ.सारिका संजय दिवेकर विरुद्ध माजी आमदार रमेश थोरात यांच्या राष्ट्रवादी गटाचे डॉ.विशाल दत्तात्रय खळदकर यांच्या पत्नी सौ. डॉ.गायत्री विशाल खळदकर यांच्यात होत असून या दोन्ही कुटुंबांना राजकीय वारसा असल्याने या लढतीकडेही तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
नाराज आणि अपक्षांचा कुणाला फटका बसणार – या तिन्ही गटांमध्ये जरी कुल आणि थोरात गट प्रबळ असले तरी या गटांमध्ये नाराज असलेले आणि तिकीट न मिळालेले उमेदवार हे अपक्ष म्हणून उभे राहिलेले आहेत. त्यामुळे या अपक्ष उमेदवारांचा फटका नेमका कुणाला बसणार याकडेही तालुक्याचे लक्ष लागून आहे.






