दौंड (पुणे) : दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली या ठिकाणी घडलेल्या दुर्दैवी घटनेचे आज विधानसभेत पडसाद उमटले. दौंडचे आमदार राहुल कुल यांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची मागणी करत तालुक्यात अतिरिक्त पोलिस बळ वाढवून नविन पोलिस ठाणी लवकरात लवकर कार्यान्वित करावीत अशी मागणी केली.
पंढरपूर वारीसाठी व देवदर्शनासाठी निघालेल्या पुणे जिल्ह्यातील वारकरी भजनमंडळींवर दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली परिसरात सोमवारी (दि. ३० जून २०२५) पहाटेच्या सुमारास भीषण हल्ला झाला. दोन अज्ञात युवकांनी कोयत्याचा धाक दाखवून, डोळ्यात मिरची पूड फेकून महिलांच्या अंगावरील सुमारे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटले. यासोबतच, त्यांच्या समवेत असलेल्या अल्पवयीन मुलीला बाजूला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली.
या पार्श्वभूमीवर, दौंडचे आमदार राहुल कुल यांनी महाराष्ट्र विधानसभेत या घटनेचा तीव्र निषेध केला आणि त्यांनी मागणी करताना, ‘संबंधित आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, त्यांच्या विरुद्ध कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि या घटनेतील पीडितांना त्वरित न्याय मिळावा यासाठी खटला जलदगती (फास्ट ट्रॅक) न्यायालयात चालवावा’ तसेच दौंड तालुक्यातील पोलिसांची संख्या अपुरी असल्याने, दौंड व यवत या दोन पोलीस स्टेशनचे विभाजन करून पाटस येथे नवीन पोलीस स्टेशन मंजूर करावे आणि आवश्यक मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी आमदार राहुल कुल यांनी केली.