दौंड : खडकवासला धरण साखळीमध्ये होत असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातून दौंड तालुक्यातून जाणाऱ्या भीमा नदी पात्रामध्ये होणारा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. सध्या भीमानदी पाणी पातळी ही 499.20 मी इतकी असून सध्याचा विसर्ग हा 15,381 क्युसेकस इतका करण्यात आला आहे. पावसाच्या आगमनानुसार आणि वर्तमान परिस्थितीनुसार हा विसर्ग कमी, जास्त होऊ शकतो अशी माहिती खडकवासला पाठबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.
त्यामुळे दौंडचे तहसीलदार अरुणकुमार शेलार आणि खडकवासला पाटबंधारे उपविभाग क्र 1 ,दौंड चे उप विभागीय अभियंता इंजिनियर शं. मा. बनकर यांनी सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करत असे सूचित केले आहे की, कोणत्याही नागरिकांनी, प्रवाश्यांनी नदीपात्रात उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत असे आवाहन केले आहे.
त्यामुळे भीमा नदीकाठच्या नागरिकांनी विशेष खबरदारी घेऊन वरील सूचनांचे पालन करावे आणि सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.