न्यू अंबिका कलाकेंद्राने 32 वर्षांची परंपरा जपत लावणी, अभंगाच्या जुगलबंदीसह वारकऱ्यांना दिले जेवण

अब्बास शेख

केडगाव (दौंड) : देहू गावातून पंढरपूरकडे निघालेला संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवारी दौंड तालुक्यात दाखल झाल्यानंतर यवत येथे मुक्कामी होता. मंगळवारी सकाळी यवत येथील मुक्काम आटोपून हा पालखी सोहळा वरवंड च्या दिशेने  मुक्कासाठी मार्गस्थ झाला. यावेळी यवत आणि वरवंड यांच्यामध्ये वारीच्या वाटेवर असणाऱ्या केडगाव-चौफुला येथील न्यू अंबिका कला केंद्र येथे सालाबाद प्रमाणे वारीमधील वारकऱ्यांच्या मनोरंजनासाठी लावण्या आणि अभंगाची जुगलबंदी सादर करून जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

गेल्या 32 वर्षांपासून पालखी सोबत येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्याची ही परंपरा न्यू अंबिका सांस्कृतिक कलाकेंद्राने अखंडितपणे सुरू ठेवली आहे. जसे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू वरून निघाल्यानंतर वारीच्या वाटेवर अनेक नागरिक पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची सेवा करतात त्याच पद्धतीने या कला केंद्रातील महिला कलावंत सुद्धा लावणी कला आणि अभंग गीते सादर करून दमल्या, भागलेल्या वारकऱ्यांचा मानसिक थकवा दूर करून त्यांची सेवा करतात. आम्हाला वारीत सहभागी होता येत नाही म्हणून आम्ही येथूनच पांडुरंगाला नमन करून ही सेवा अर्पण करतो असे कलावंत सांगतात.

वारीला निघालेल्या वारकऱ्यांना न्यू अंबिका कला केंद्राचे संचालक डॉ. अशोक जाधव व सौ. जयश्री जाधव यांच्याकडून यावर्षीही सुमारे 10 हजार वारकऱ्यांसाठी जेवणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. यावेळी न्यू अंबिका कला केंद्राच्या समोरील बाजूस मोठा स्टेज उभारून त्यावर कला केंद्रामधील महिला कलावंतांनी आपली लावणी आणि अभंग गीतांची कला सादर करत वारीमधील वारकऱ्यांचे मनोरंजन केले.

यावेळी न्यू अंबिका कलाकेंद्राचे संचालक डॉ.अशोक जाधव यांनी बोलताना, लावणी कलावंत मनोभावे पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची सेवा करतात, कलावंतांना पंढरपूर ला जाता आलं नाही तरी वारकर्यांमध्येच ते विठ्ठलाला शोधत असतात आणि यातूनच ते अलौकिक असे समाधान मिळवतात असे सांगितले.