जनतेचे रक्षण करणे हे जवानांनी आपले आद्य कर्तव्य समजावे, अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर

अख्तर काझी

दौंड : महाराष्ट्र पोलीस दल हे देशात अग्रगण्य पोलीस दल असून त्या पोलिस दलामध्येच आपण सामील होत आहात याचा अभिमान बाळगावा. जनतेचे रक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य समजावे असे राज्य राखीव पोलीस बलाचे अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर म्हणाले. नानवीज(दौंड) येथे नवप्रविष्ट पोलीस जवानांचा 68 वा दीक्षांत संचलन सोहळा संपन्न झाला याप्रसंगी नवप्रविष्ट जवानांना मार्गदर्शन करताना व्हटकर बोलत होते.

यावेळी राज्य राखीव पोलीस बलाचे(पुणे) पोलीस उप महानिरीक्षक विजयकुमार मगर, नानवीज पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य नंदकुमार ठाकूर, समादेशक श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, समादेशक प्रभाकर शिंदे तसेच प्रशिक्षणार्थी यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

राजकुमार व्हटकर म्हणाले की, जवानांनी राखीव पोलीस बलाचे ध्येय व उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे व इमानदारीने पार पाडावे. व्यसन, आर्थिक जुगार, ऑनलाइन गेमिंग पासून दूर राहावे. तसेच आपल्या आई-वडिलांनी दिलेले संस्कार कायम जतन करावेत. प्रशिक्षणा दरम्यान मिळवलेला फिटनेस सेवा निवृत्ती पर्यंत कायम ठेवण्याचा सल्ला राजकुमार व्हटकर यांनी जवानांना दिला.

राज्य राखीव पोलीस बलातील एकूण 661 नवप्रविष्ट पोलीस शिपाई यांना दिनांक 28 सप्टेंबर 2024 पासून नानवीज प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण झाल्याने प्रशिक्षणार्थी यांचा दीक्षांत संचलन सोहळा आयोजित करण्यात आला होता. दीक्षांत संचलन सोहळ्यामध्ये राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य सोमनाथ वाघचौरे यांनी सर्व प्रशिक्षणार्थींना पद व गोपनीयतेची शपथ दिली. प्रशिक्षणार्थींना तत्कालीन प्राचार्य रामचंद्र केंडे, विद्यमान प्राचार्य सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व प्रशिक्षक यांनी अतिशय मेहनत घेऊन खडतर प्रशिक्षण दिले आहे.

दीक्षांत संचलन सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्राचे उपप्राचार्य बी.पी. जाधव, एस.डी. सानप तसेच सर्व पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार यांनी मोलाचे परिश्रम घेतले.