मोदी एक अतृप्त आत्मा, सध्या महाराष्ट्रात भटकत आहे

मुंबई : काल पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांना भटकती आत्मा असे विश्लेषण लावून टिका केली होती. आज मोदी यांच्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना (उबाठा) यांच्याकडून टिकेची झोड उठविण्यात आली आहे.

खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करताना, मोदी हे अतृप्त आत्मा असून हा आत्मा सध्या महाराष्ट्रात फिरत असल्याचे म्हटले आहे.
संजय राऊत यांनी मोदींवर मोदी टिका करताना, मोदी काय म्हणतात त्याकडे जास्त लक्ष देऊ नका ते भटकते आत्मे आहेत. मोदींचा एक अतृप्त आत्मा आहे आणि तो आत्मा महाराष्ट्रात भटकत आहे. जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत जे मराठी माणसाचे शत्रू आहेत अशा सर्वांचे आत्मे महाराष्ट्रात गेल्या चारशे वर्षांपासून भटकत आहेत. त्यात हा एक गुजरातचा नविन आत्मा आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

यांना संविधान बदलायचे आहे त्यामुळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेत नाहीत अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांनी अनेक सभांमध्ये काँग्रेस, मुस्लिम या विषयांवर टिका केली आहे. मुस्लिमांवर थेट करण्यात येत असलेल्या टिकेमुळे यावेळी मुस्लिम समाज भाजपला आणि भाजप पुरस्कृत उमेदवारांना किती सहकार्य करतो हे लवकरच समजणार आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या टिकेनंतर शरद पवार गटात असंतोष पहायला मिळत असून यावेळी यांना जागा दाखवू असा चंग आता राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी बांधल्याचे दिसत आहे. मोदींच्या टिकेचा फायदा होणार की तोटा याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.