अंबड : मराठा आरक्षण आंदोलनानंतर आता ओबीसी बांधवांनिही अंबड येथे ओबीसी बांधवांची सभा आयोजित करत मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण नको असा आग्रह धरला आहे. ओबीसी बांधवांच्या सभेत यावेळी छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्यावर निशाणा साधत, मराठा समाजाचे नवीन नेत्यांना हे आरक्षण कळणार नाही, ते त्यांच्या डोक्याच्या बाहेर आहे. कुणाचं खाताय म्हणतो, अरे तुझं खातो काय?, यांना काहीच माहित नाही. अरे आरक्षण काय आहे आधी ते तर समजून घे, आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही पण ते सरसकट ओबीसीतून नको असे छगन भुजबळ यांनी म्हणत, दोन वर्ष बेसन भाकर खाऊन आला असा हा (जरांगे) म्हणतो, हो खातो बेसण भाकर, कांदा आजही खातो. पण, तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही, असा पलटवार भुजबळांनी जरांगे यांच्यावर केला या सभेतून केला.
मंत्री छगन भुजबळ यांनी अंबड येथील सभेत उपस्थितांना संबोधताना जरांगे यांच्यावर तुफान हल्ला चढवला, यावेळी त्यांनी बोलताना.. कोणाचं खाता कोणाचं खाता? असे म्हणतो, पण तुझे खातो काय रे ? असं म्हणत तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही. मराठा तरुणांना मला सांगायचे आहे, या दगडाला शेंदूर लावून कोणता देव करायच आहे? त्याला आरक्षण कळेना, आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, असं भुजबळ म्हणाले. जालन्यातील अंबडमध्ये आज ओबीसी बांधवांच्या सभेला मोठी गर्दी जमली होती. या सभेला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, महादेव जानकर आदींसह अनेक राजकीय नेते उपस्थित होते.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये यासाठी आज जालन्यात विराट सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी विविध वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी आमदार आशिष देशमुख बोलतांना म्हणाले की, “बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात होत असलेल्या आंदोलनास्थळी सर्वात अगोदर देवेंद्र फडणवीस आले होते. ओबीसींना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे की, सरसकटचे दाखले मराठा समाजाला देता येणार नाही. ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचं काम मनोज जरांगे करत आहेत. त्यामुळे, मनोज जरांगे यांनी आपला बाल हट्ट सोडावा, असे ते म्हणाले.
बबनराव तायवाडे यावेळी बोलतांना म्हणाले की, “मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. मराठा आंदोलकांकडून सरकारवर दडपण आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यमागास वर्गाकडून अगोदरच ओबीसीमध्ये आहेत, त्यांचे सर्वेक्षण करू नयेत, असे म्हणाले.
काँग्रेस आमदार राजेश राठोड यावेळी बोलतांना म्हणाले की, “राज्यातले सखार कारखाने भटक्या आणि विमुक्त लोकांच्या जीवावर सुरू आहेत. ओबीसी नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या विरोधात वक्तव्य थांबवायला हवेत. या पुढे ओबीसी नेत्यांच्या विरोधात बोलत असेल, तर मोठा भाऊ असलेल्या लोकांना छोट करायला वेळ लागणार नाही, असे आमदार राजेश राठोड म्हणाले.
ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यावेळी बोलतांना म्हणाले की, “जरांगेंच्या सभेला तितक्यात तोला मोलाचं उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा पाहावी, एका सभेवरती आम्ही थांबणार नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणी अशीच सभा होईल. जरांगे सभा मोठी झाली म्हणजे आरक्षण मिळत नसतं. भुजबळांकडे या तुम्हाला ते आरक्षणाचा मार्ग दाखवतील. एक भुजबळ तुम्ही पाडाल तर, 160 मराठे आम्ही पाडू, असा इशारा यावेळी शेंडगे यांनी दिला. भुजभळ म्हातारे झाले असले, तरी सिंह आहेत. भुजबळ साहेब तुम्ही आदेश द्या ओबीसींची सत्ता आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कुणब्यांचे दाखले देतायत ते ताबडतोब बंद करा, अन्यथा 24 च्या निवडणुकीत कुठे पाठवायचं हे ओबीस ठरवेल. पालावरच्या भटक्य़ा विमुक्तींच्या नोंदी का तपासल्या जात नाही, असेही शेंडगे म्हणाले.
रासप प्रमुख महादेव जानकर म्हणाले की, ओबीसीचा जोपर्यंत पक्ष नाही, तोपर्यंत न्याय मिळणार नाही. जो पर्यंत ओबीसी समाजाचे पक्ष होत नाही, तोवर त्याला अर्थ राहत नाही. काँग्रेस भाजपवाले तुम्हाला लुटून जातील असेही शेवटी जानकर म्हणाले.