दौंड मध्ये पहिल्यांदाच कर्णबधिर विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

अख्तर काझी

दौंड : कर्णबधिर असूनही बोलणे शिकत असलेल्या मुलांचे वार्षिक स्नेहसंमेलन दौंड मध्ये आयोजित करण्यात आले आहे. बौद्धिक व शारीरिक क्षमतेमध्ये काहीही कमी नसते, वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत ऐकण्याचे व बोलण्याचे प्रशिक्षण दिल्यास अशी मुले व्यवस्थित ऐकू आणि बोलू शकतात आणि नॉर्मल शाळेत शिक्षण घेऊ शकतात.

पुण्यातील कोकलिया संस्थेतर्फे गेली तीन वर्ष अशा कर्णबधिर मुलांच्या पुनर्वसनाचे काम दौंड मध्ये चालू आहे. अशा कर्णबधिर असूनही बोलणे शिकत असलेल्या मुलांचे स्नेहसंमेलन दि.29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता येथील योगराज मंगल कार्यालयामध्ये संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाला दौंड चे विद्यमान आमदार राहुल कुल व माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया हे प्रमुख पाहुणे उपस्थितीत राहणार आहेत. दौंडकरांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक कर्णबधिर बालकांचे बहु आयामी अपंग पुनर्वसन व सर्वांगीण विकास केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.