Ajit Pawar – अजितदादा… दौंड मधील व्यापाऱ्यांना न्याय मिळवून द्या ! व्यापारी महासंघाचे अजितदादांना पत्र



|सहकारनामा|

दौंड : जिल्ह्याचे पालक मंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी येथील व्यापाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाचा विचार करून त्यांना न्याय मिळविण्यासाठी मदत करावी अशी मागणी येथील दौंड मर्चंट असो. व व्यापारी महासंघाने केली आहे. शहरातील कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर हा 10% पेक्षा कमी असतानाही येथील व्यापाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी (पुणे) प्रशासनाच्या नवीन धोरणानुसार निर्बंधातून शिथीलता दिलेली नाही, हा येथील व्यापाऱ्यांवर अन्याय असल्याचे व्यापारी महासंघाने म्हटले आहे. 

संघाचे अध्यक्ष राजेश पाटील व राजेंद्र ओझा यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना पत्र पाठवून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. राज्यात ज्या महापालिका, नगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येची टक्केवारी ही 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे त्या ठिकाणची सर्व दुकाने दिनांक 1 जून पासून सकाळी 7 ते दुपारी 2 वाजे पर्यंत उघडी ठेवण्या बाबतचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यावा अशा सूचना राज्य सरकारने सर्वत्र दिल्या आहेत.  

दौंड शहरातील रुग्णांची टक्केवारी ही 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे असे असतानाही जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार येथील दुकाने 15 जून पर्यंत बंदच ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशामुळे पुणे शहराला एक न्याय व दौंड ला वेगळा न्याय असा प्रशासनाचा दुटप्पीपणा दिसतो आहे. सध्या दौंड मध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे, दवाखान्यातील ऑक्सीजन बेड रिकामे आहेत. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांना निर्बंधातून सूट मिळावयास हवी. दोन महिन्यांच्या प्रदीर्घ लॉक डाऊन मुळे येथील व्यापारी, व्यवसायिक हे आर्थिक व मानसिक दृष्ट्या पूर्णपणे खचलेले आहेत. बँकांचे कर्ज व रोजचा खर्च भागविण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.

त्यामुळे व्यापाऱ्यांची सहनशीलता आता संपली आहे.ना. अजित पवार यांनी या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून येथील व्यापाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा व पुण्याप्रमाणेच येथील दुकानेही उघडण्याची परवानगी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.