तालुक्यातील 80 टक्के रस्त्यांची कामे निकृष्ठ पद्धतीची, अधिकारी, ठेकेदारांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी : भानुदास शिंदे यांची मागणी

दौंड : 

रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे यांनी दौंड तालुक्यातील रस्त्यांच्या दुर्दशेबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांना निवेदन दिले असून या निवेदनामध्ये रस्त्यांच्या स्थितीबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

शिंदे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये, दौंड तालुक्यात वेगवेगळ्या निधीमधून वेगवेगळ्या प्रकारचे रस्त्यांची कामे झालेली आहेत. परंतु 80% कामेही निकृष्ट पद्धतीची झाल्यामुळे पहिल्या सहा महिन्यात रस्ते खराब झाले आहेत. खड्डे पडणे, साईट पट्ट्याची कामे न करणे, तसेच निकृष्ट प्रतीचे काम यामुळे सदर कामांच्यामध्ये गंभीरपणे निष्काळजीपणा व अनियमितता झाल्याचे दिसून येत असल्याचे म्हटले आहे.

हे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांना देण्यात आले असून अनेक कामे अर्धवट अवस्थेमध्ये आहेत त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. लवकरच दौंड तालुक्यात उसाचा गाळप हंगाम चालू होणार असून दौंड तालुक्यातून चाळीस लाख टन उसाची वाहतूक केली जाते. खराब रस्ते, खड्डे पडलेले रस्ते व साईट पट्ट्या भरलेल्या नसणे यामुळे दरवर्षी अपघात होतात पण त्याकडे कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे त्वरित मागील चार वर्षापासून झालेल्या सर्वच प्रकारच्या रस्ते कामांची चौकशी करून दोषी अधिकारी व ठेकेदार यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच रखडलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात यावीत,  दुरुस्ती करण्यात यावी असे न झाल्यास जे रस्ते खराब आहेत व रस्त्यात खड्डे आहेत अशा सर्व रस्त्यांच्या वरती रयत क्रांती संघटना तर्फे वृक्षारोपणाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा रयत क्रांती संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.