Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
दौंड : लखीमपुर खीरी( उत्तर प्रदेश) येथे आंदोलक शेतकऱ्यांना वाहनाने चीरडण्यात आले, या घटनेच्या निषेधार्थ दौंड मध्ये महाविकास आघाडीच्या वतीने दौंड बंद आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला. तसेच या घटनेतील मृत शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आज संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस स्टेशन समोरील संविधान स्तंभा समोर राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस व शिवसेनेच्या महाविकास आघाडीने निषेध सभा घेतली.मा. आमदार रमेश थोरात, वैशाली नागवडे, आप्पासो. पवार, हरीश ओझा, आबा वाघमारे, आनंद पळसे, राजू जाधव यांनी आपल्या भाषणातून केंद्रातील भारतीय जनता पार्टी सरकारच्या हुकूमशाही पद्धतीने चालविल्या जात असलेल्या कार्य पद्धतीवर घणाघाती टीका केली.
आघाडीच्या वतीने प्रशासनाला आंदोलनाचे निवेदन देण्यात आले. उत्तर प्रदेशातील शेतकरी गेली अनेक महिने आपल्या न्याय हक्कासाठी केंद्रातील मोदी सरकार पर्यंत आपले म्हणणे पोहोचविण्यासाठी आंदोलन करीत आहेत. भाजपा सरकार साम, दाम, दंडाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. तरीही आंदोलन थांबत नसल्याने आता तर शेतकऱ्यांनाच संपविण्याचा घाट या सरकारने चालविला आहे. केंद्रातील मंत्र्याच्या गाडीखाली आंदोलकांना चिरडून मारण्याचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. भाजपाची हुकूमशाही मोडून काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे असल्याने या घटनेच्या निषेधार्थ दौंड बंद आंदोलन करीत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. राज्याचे उप. मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांवर व घरांवर भाजपा सरकारच्या आदेशाने आयकर विभागाने छापे टाकून विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न चालविला आहे, या घटनेचा ही यावेळी निषेध नोंदविण्यात आला. बंद ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. महाविकास आघाडीतील पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.