दौंड तालुक्यातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी



दौंड : सहकारनामा ऑनलाईन(अब्बास शेख)

 तालुक्यातील बिबट्याच्या बंदोबस्तासाठी शासनाने उपयोजना कराव्यात अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे केली आहे.

आमदार राहुल कुल आणि दिलेल्या निवेदनात दौंड  तालुक्यात बिबट्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून बिबट्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ले करायला सुरवात केली असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून बिबट्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता व मनुष्यवस्तीत त्यांचा वावर वाढत असल्यामुळे भविष्यात बिबटे मनुष्यावर देखील हल्ले करण्याची शक्यता आहे. हा वाढता धोका लक्षात घेता बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी तालुक्यातील शेतकरी व नागरिक करीत आहे. दौंड तालुक्यातील बिबट्याच्या बंदोबस्त करण्याबाबत व त्याला पकडणेसाठी आवश्यकतेनुसार पिंजरे लावण्याबाबत ठोस उपयोजना करण्यात याव्यात अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, विरोधीपक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री, तथा पालकमंत्री पुणे अजितदादा पवार व वनमंत्री संजय राठोड यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.