पाटस : दौंड तालुक्यातील पाटस येथे व्यवसायातील बिलाच्या वादातून भर चौकात गोळीबार करण्यात आल्याची घटना आज ५ जून रोजी दुपारी घडली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हवेत तीन आणि एका गाडीवर एक असे चार फायर करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच यवत चे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख आणि त्यांच्या इतर स्टाफने घटनास्थळी त्वरित धाव घेत यातील तीन आरोपिंना पकडले असून अन्य काहीजण उसाच्या शेतात जाऊन लपले आहेत.
पोलिसांचा उसाच्या शेतीला गराडा – गोळीबार केल्यानंतर काही आरोपी उसाच्या शेतात घुसले असून त्यांचा पाठलाग करणाऱ्या यवत पोलिसांनी संपूर्ण उसाच्या क्षेत्राला गराडा घातल्याची माहिती मिळत आहे. यातील तीन आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आले असून उर्वरित आरोपिंचा उसाच्या शेतात शोध घेतला जात आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये. या प्रकरणातील काही आरोपी पकडले असून यातील अन्य आरोपी त्वरित पकडले जातील अशी माहिती पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली आहे. तसेच एक गोळीची पुंगळी मिळाली असून नेमके किती राउंड फायर झाले हे तपासात पुढे येईल अशीही माहिती त्यांनी दिली आहे.






