Shiv Jayanti – शिवजयंती निमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दौंडमध्ये व्याख्यान मालेचे आयोजन



दौंड : सहकारनामा (अख्तर काझी)

जाती-पातीला थारा न देता सर्व समाजातील, तळागाळातील शूर मावळ्यांना सोबत घेऊन ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुठ बांधली, स्वराज्य मिळवून दिले अशा थोर शिवाजी महाराजांचे विचार सध्याच्या युवा पिढी पर्यंत पोहोचावे व ते विचार सर्व समाजाने युवकांनी अंगीकारावे या उद्देशाने येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिवजयंती निमित्त व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले होते. 

व्याख्यानमालेस युवकांनी मोठा प्रतिसाद दिला. पंचायत समितीचे माजी सभापती आप्पासाहेब पवार, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, पोलीस निरीक्षक नारायण पवार, उद्योजक बाळासाहेब निवंगुणे, ज्येष्ठ नगरसेवक बादशहा शेख, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पानसरे आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. सामाजिक सेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा  जयंती निमित्ताने समाजरत्न पुरस्कार देऊन यावेळी सन्मान करण्यात आला. 

व्याख्यान  मालेतील  प्रमुख  वक्ते  सूर्यकांत  भालेराव, प्राध्यापक  बी. वाय. जगताप  यांच्यासह पो. नि. नारायण पवार, अजिंक्य येळे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अश्विन वाघमारे यांनी आपल्या मनोगतातून शिवरायांच्या महान विचारांचा, कार्यांचा आढावा घेतला.

शिवरायांचे विचार मांडताना बी.वाय. जगताप म्हणाले, शिवाजी महाराजांनी कधीच जाती पातीचा विचार केला नाही, स्त्रियांना सन्मानाने वागणूक दिली आणि म्हणूनच शिवाजी महाराज अजरामर ठरले. महाराज फक्त भारताचे नव्हे तर जगाचे आराध्य दैवत आहे. महाराजांचे विचार जर आपण तळागाळा पर्यंत पोहोचवु शकलो तर लोकांच्याही विचारात व वागणुकीमध्ये निश्चितच फरक पडेल आणि समाजाचा विकास होईल आणि महाराजांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल.

सूर्यकांत वाघमारे आपले विचार मांडताना म्हणाले की, जे काळाच्या पडद्यावर आपले विचार कोरतात, जी माणसे मरूनही जिवंत राहतात ते म्हणजे शिवाजी महाराज, ते म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर. महाराजांनी शूद्रांना, अति शूद्रांना त्यांच्या अंगा खांद्यावरील घोंगड्या बाजूला काढल्या, त्यांच्या कमरेला शेले गुंडाळले, हातात तलवारी दिल्या आणि लढा माझ्या मित्रांनो, अन्याया विरोधात प्राणपणाने लढा असे सांगणारे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. वाचा शिवचरित्र म्हणजे तुम्ही कोणासमोर नतमस्तक होणार नाही, असेही वाघमारे म्हणाले. 

साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांनी शिवाजी महाराजांचे विचार रशिया पर्यंत पोवाड्या मार्फत पोहोचविले. शिवाजी महाराजांचे चरित्र, विचार संपूर्ण देशात होते. परंतु जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली आणि त्यावेळी काही साहित्यिकांनी महाराजांच्या नावाचा वापर केला. महाराष्ट्राला शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आणि दुसऱ्या राज्याला नुसताच भूगोल आहे असे म्हंटले जाऊ लागले. मग महाराष्ट्र सोडून इतर राज्यांना वाटू लागले की शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचेच आहेत, आपले नाहीत. 

त्यांनी आपल्या घरातील महाराजांचे फोटो काढून टाकले आणि त्यामुळे महाराज राहिले महाराष्ट्रापुरते, हा उद्योग आपल्या माणसांनी केला. पुढे महाराज म्हंटले की पुराणा विरुद्ध कुराण, मंदिर विरुद्ध मस्जिद अशी परिस्थिती निर्माण केली गेली. शिवाजी महाराज फक्त हिंदूंचेच ते मुसलमानांचे नाहीत असे चित्र उभे केले गेले. तेही चित्र पुढे थोडे पुसले गेले, आणि महाराज सर्व हिंदूंचे नाही तर फक्त मराठ्यांचेच असे सांगून त्यांना आणखीन लहान करण्यात आले आहे. म्हणून हात जोडून विनंती आहे की शिवाजी महाराज ना कोणत्या पक्षाचे, ना जातीचे, ना धर्माचे आहेत ते अखिल मानव जातीचे आहेत असेही शेवटी भालेराव म्हणाले. 

वंचित बहुजन आघाडीचे अश्विन वाघमारे, रमेश तांबे, ॲड. किरण लोंढे, सुरज वाघमारे, रितेश सोनवणे, तसेच भिमक्रांती सेनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.