दौंडसाठी आनंदाची बातमी : दौंड उपजिल्हा रुग्णालयात 37 लाख 50 हजार रुपयांचे 3 व्हेंटिलेटर दाखल, आ.कुल यांच्या विनंतीची प्रशासनाकडून दखल



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

कोरोनाबाधित, अत्यवस्थ रुग्णांना व्हेंटिलेटर बेड मिळविण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक ठिकाणी व्हेंटिलेटर अभावी रुग्ण दगावल्याच्या घटना समोर येत असताना दौंड तालुक्यात व्हेंटिलेटरची गरज असलेल्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, आ.राहुल कुल यांनी जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडे व्हेंटिलेटर उप्लब्धतेबाबत लक्ष वेधले होते. त्याची दखल घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे आज दौंड उपजिल्हा रुग्णालयाला ३ व्हेंटिलेटर प्राप्त झाले आहेत.  या एका व्हेंटिलेटरची किंमत सुमारे १२ लाख ५० हजार रुपये ईतकी असुन व्हेंटिलेटर उपलब्ध होणारे दौंड उपजिल्हा रुग्णालय हे ५० बेड्चे पुणे जिल्ह्यातील पहिलेच रुग्णालय आहे. 

याबाबत आमदार कुल यांनी बोलताना, दौंड तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य सेवेला बळकटी देणारे हे पाऊल असून याद्वारे शासकीय यंत्रणेमार्फत उपचार घेणाऱ्या गोर गरीब रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे. दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांचे देखरेखी खाली यांचे संचालन केले जाणार आहे. आ.कुल यांच्या विनंतीची दखल घेतल्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नंदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांचे त्यांनी हार्दिक आभार मानले आहे.

दौंड शहर, दौंड ग्रामीण व राज्य राखीव पोलीस दलाचे जवान आदी सर्व विचारात घेता तालुक्यात आज पर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेले सुमारे ६३३ रुग्ण आढळले आहेत यातील २३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर ४४८ रुग्ण उपचारांती बरे होऊन परतले आहेत. तसेच १६२ रुग्ण हे उपचार घेत आहेत. आजतागायत दौंड तालुक्यातील ५०२२ हुन अधिक नागरिकांची कोविड तपासणी करण्यात आली आहे. 

कोरोना विरुद्धच्या या लढ्यामध्ये दौंड तालुक्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा अहोरात्र कार्यरत राहून नागरिकांना सेवा देत आहे.  कोरोना रुग्णांची तपासणी, उपचार, विलगीकरणात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी सोयी सुविधा आदी बाबत तालुका प्रशासन दक्ष राहून वेळीच योग्य पाऊल उचलत आहे या साठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे, डॉ. शशिकांत ईरवाडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक राजगे यांच्या सह सार्वजनिक आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी, परिचारिका भगिनी विशेष कौतुकास पात्र आहेत. एकमेकांच्या साथीने आपण सर्व मिळून लवकरच या संकटाला मात देऊ असा विश्वास आ.राहुल कुल यांनी व्यक्त केला आहे.