पारगाव : सामाजिक बांधिलकी, जनसेवा आणि गावाच्या सर्वांगीण विकासाची भावना जपत स्वामी विवेकानंद विचार मंचाच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. याच सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून दर शनिवारी ‘स्वच्छ शनिवार’ हा उपक्रम राबविण्यात येत असून, गावातील विविध सार्वजनिक ठिकाणी श्रमदानातून स्वच्छता केली जात आहे.
या उपक्रमांतर्गत ग्रामदैवत मंदिर परिसर, विविध धार्मिक स्थळे, स्मशानभूमी, दफनभूमी, बाजारतळ, खेळाची मैदाने तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येते. ‘आपले गाव, आपली जबाबदारी’ ही भावना ग्रामस्थांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. याच उपक्रमांतर्गत शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी पारगाव येथील दफनभूमी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
परिसरात मोठ्या प्रमाणात वाढलेले गवत-घास, झुडपे व कचरा असल्याने मोठ्या प्रमाणावर श्रमदान करण्यात आले. यावेळी स्वामी विवेकानंद विचार मंचाचे कार्यकर्ते, राजे संभाजी मित्र मंडळाचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. परिसर विस्तीर्ण असल्याने उपलब्ध वेळेत शक्य तितकी स्वच्छता करण्यात आली असून, काही भागातील स्वच्छता अद्याप बाकी आहे. उर्वरित स्वच्छतेचे कामही सामूहिक सहभागातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
विविध सामाजिक उपक्रमांतून जनसेवेचा वसा
स्वच्छता अभियानाबरोबरच स्वामी विवेकानंद विचार मंचाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिरासारखे समाजोपयोगी उपक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. रक्तदानासारख्या उपक्रमातून नागरिकांमध्ये सामाजिक जबाबदारी आणि गरजूंसाठी मदतीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.
तसेच गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि एकोपा वाढविणाऱ्या विविध उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात येते. सार्वजनिक उत्सवाच्या माध्यमातून नागरिकांचा सहभाग वाढविणे आणि समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करणे, यावर मंचाचा भर आहे. गावातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, आरोग्यविषयक जनजागृती, सामाजिक सेवा आणि सांस्कृतिक उपक्रम अशा विविध माध्यमातून गावाच्या सर्वांगीण सामाजिक विकासासाठी योगदान देण्याचा मंचाचा प्रयत्न सुरू आहे.
स्वच्छता, सेवा, श्रमदान, सामाजिक बांधिलकी आणि एकोपा या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून सुरू असलेले विविध उपक्रम पारगांव (सालू मालू) गावात सकारात्मक सामाजिक वातावरण निर्माण करणारे ठरत आहेत. भविष्यातही अशाच प्रकारचे अधिकाधिक समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा मानस स्वामी विवेकानंद विचार मंचाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.







