राष्ट्रवादी काँग्रेसचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा

पारगाव : (विकास शेळके)

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने दापोडी (ता.दौंड ) येथील महावितरण कार्यालयावर माजी आमदार रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कंपनीच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
महावितरण कंपनीच्या चुकीच्या धोरणांमुळे तालुक्यामध्ये वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, वाढते लोडशेडींग, कमी दाबाने होणारा वीजपुरवठा तसेच नादुरुस्त रोहित्रांमुळे तालुक्यातील शेतकरी व व्यावसायिक यांना मोठ्या प्रमाणात विजेच्या अनुषांगिक येणाऱ्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे यावेळी माजी आमदार रमेश थोरात म्हणाले.

जनावरांना लागणारा चारा तसेच तरकारी पिके यासाठी शेतकरी वर्गाची लगबग सुरू असून पिकाची लागवड सुरू असताना महावितरण कडून विजेचा सावळा गोंधळ सुरू असल्याने शेतकरी आणि नागरिक त्रस्त असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. पुढे बोलताना त्यांनी उन्हाळ्याचे दिवस असल्याने उष्णतेचा पारा ४२ अंश सेल्सियस पेक्षा अधिक झाल्याने ग्रामीण भागातील जनता अस्वस्थ झाली आहे. उष्मघाताचे आजार देखील होत आहेत. महावितरण कंपनीला वेळोवेळी कल्पना देऊनही नियोजनात काही सुधारणा होत नाही. महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे दिवसेंदिवस समस्या वाढतच चालल्या आहेत यामुळे शेतकरी ,व्यवसायिक वर्गाचे आर्थिक नुकसान होत असल्याने ते हवालदिल झालेले आहेत. रोहित्र दुरुस्त करण्यास एक महिन्याचा कालावधी लागतो या सर्व बाबी गंभीर स्वरूपाच्या आहेत.

या समस्यांवर तात्काळ उपाय योजना करून वीज पूरवठा सुरळीत करावा अन्यथा यापेक्षाही मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी मा.आ.थोरात यांनी दिला. यावेळी वैशाली नागवडे, आप्पासाहेब पवार, पोपटराव ताकवणे, वीरधवल जगदाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दापोडी येथील महावितरण कार्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन करण्यात येऊन पक्षाच्या वतीने तेथील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी वैशाली नागवडे, आप्पासाहेब पवार, वीरधवल जगदाळे, आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.