दौंडमधील तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी प्रत्येकी ५ कोटींचा निधी व ‘ब’ वर्ग दर्जा, विधानसभेत राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

दौंड : दौंड मतदारसंघातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा कायापालट करण्यासाठी आणि भाविकांना उत्तम सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. राहू येथील श्री शंभू महादेव मंदिर, कुसेगावचे भानोबा देवस्थान आणि नारायण बेट (देऊळगाव गाडा) या तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा देऊन त्यांच्या विकासासाठी प्रत्येकी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे.

विधानसभेत ‘अर्धा तास चर्चे’च्या माध्यमातून आमदार राहुल कुल यांनी मतदारसंघातील तीर्थक्षेत्रांचा प्रश्न आक्रमकपणे मांडला. यावेळी त्यांनी केवळ या तीनच नव्हे, तर केडगावचे पद्मावती माता मंदिर, रोटीचे रोटमलनाथ मंदिर आणि राजेगावचे राजेश्वर मंदिर या देवस्थानांच्या विकासासाठीही तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.

आमदार कुल यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सांगितले की, “दौंडमधील या तीर्थक्षेत्रांचे महत्त्व मोठे असून भाविकांची संख्याही लक्षणीय आहे. राहू, कुसेगाव आणि नारायण बेट या देवस्थानांना ‘ब’ वर्ग दर्जा देण्याबाबतच्या प्रस्तावातील त्रुटी जिल्हा परिषदेकडून तातडीने दूर केल्या जातील. या प्रत्येक देवस्थानाला बळकटी देण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी शासन देईल.” याव्यतिरिक्त, नारायण बेट येथील वनक्षेत्रातील जागा आणि पोलीस अधीक्षक (SP) कार्यालयाकडून मिळणारा भाविकांच्या संख्येचा दाखला यांसारख्या तांत्रिक बाबी तातडीने निकाली काढण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.

आमदार राहुल कुल यांनी यावेळी दौंडमधील इतर ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्रांनाही ‘ब’ वर्गात समाविष्ट करून घेण्याची मागणी लावून धरली. केडगाव, रोटी आणि राजेगाव येथील प्रस्तावांची पडताळणी करून निकषात बसणाऱ्या सर्व देवस्थानांना न्याय दिला जाईल, असे आश्वासनही यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून देण्यात आले.

“मतदारसंघातील धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. केवळ दर्जा वाढवणे आमचे उद्दिष्ट नसून, त्या ठिकाणी येणाऱ्या लाखो भाविकांना रस्ते, पाणी आणि भक्तनिवास यांसारख्या सर्व पायाभूत सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी हा प्रयत्न आहे. सरकारने दिलेल्या प्रत्येकी कोटींच्या निधीमुळे या देवस्थानांच्या विकासाला मोठी गती मिळेल.”