दौंड नगरपालिका उपनगराध्यक्षपदाच्या लढतीसाठी 3 अर्ज दाखल, जिल्हा बँकेच्या निकालाची पुनरावृत्ती होणार की नुसताच फार्स… राजकीय वर्तुळात चर्चा

अख्तर काझी

दौंड : दौंड नगरपालिका उपनगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. साधारणतः तीन आठवड्या पूर्वीच राष्ट्रवादी, शिवसेना युतीचे नगरसेवक संजय चितारे यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती. मात्र चीतारे यांनी अनपेक्षितपणे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या या पदासाठी उद्या दि. 12 जानेवारी रोजी नगरपालिकेमध्ये निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे. मात्र यावेळेसची ही निवड वेगळ्याच वळणावर जात असल्याची चिन्हे आज तरी दिसत आहे. याचे कारण म्हणजे संजय चीतारे यांच्या उपनगराध्यक्ष निवडी वेळी कुल -कटारिया गटाच्या नागरी हित संरक्षण मंडळाने त्यांची निवड बिनविरोध दिली, मात्र उद्याच्या होणाऱ्या उपनगराध्यक्ष पदासाठी नागरीक हित ने नगरसेवक बबलू कांबळे व अरुणा डहाळे यांचे नामनिर्देशन दाखल केले आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना युतीकडून नगरसेविका कांचन साळवे यांचे एक मात्र नामनिर्देशन आली असल्याची माहिती उप. मुख्याधिकारी सुप्रिया गुरव यांनी दिली.
नगरपालिकेतील 24 सदस्यांपैकी राष्ट्रवादी -शिवसेना युतीचे 14 सदस्य आहेत तर नागरिक हित मंडळाचे 10 सदस्य आहेत आणि नगराध्यक्षपद याच गटाकडे आहे. सभागृहामध्ये राष्ट्रवादीचे बहुमत असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे, तसेच नागरिक हित मंडळाचे तीन सदस्य सुद्धा सध्या राष्ट्रवादीच्या कळपामध्ये गेलेले दिसत असताना नागरिक हित ने यंदा लढतीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतल्याने येथील राजकीय क्षेत्रामध्ये उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. कुल- कटारिया गटाकडून काहीतरी चमत्कार घडविण्याचा प्रयत्न होतो आहे अशी दबक्या आवाजात चर्चा सध्या सुरू झाली आहे . जिल्हा बँक निवडणुकीतील घुले विरुद्ध कंद लढतीमध्ये लागलेल्या आश्चर्यकारक निकाला सारखा उद्याचा निकाल लागतो की काय याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. उद्या ही लढत बिनविरोध पार पडते की नागरिक हित चा हा डाव निव्वळ फार्स ठरतो याचे उत्तर उद्याच मिळणार आहे.