|सहकारनामा|
दौंड : शहर प्रतिनिधी (अख्तर काझी)
नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडीच्या सर्वसाधारण सभेत गटाचे एकनिष्ठ व विश्वासू नगरसेवक बबलू कांबळे यांची गटनेतेपदी एक मताने निवड करण्यात आली. नगरसेवक प्रमोद देशमुख (उप -गटनेता), पूजा गायकवाड (पक्ष प्रतोद) यांनाही नव्याने जबाबदारी देण्यात आली आहे. दौंड नगरपालिकेत नगराध्यक्षांसह 11 नगरसेवक असे विकास आघाडीचे संख्याबळ आहे.
नगरपालिकेचा कार्यकाळ दि. 6 फेब्रुवारी 2022 रोजी संपुष्टात येत असल्याने येणाऱ्या काळात करावयाच्या विविध कामांबाबत चर्चा करण्यासाठी तसेच भविष्यातील रणनीती ठरविण्यासाठी व पक्षातील सदस्यांना नवीन जबाबदाऱ्या देऊन पदांची फेररचना करण्यासाठी नागरिक हीत आघाडीने दि. 5 सप्टेंबर रोजी सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते.
या सभेत गटनेते बदलाचा निर्णय घेण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष शितल कटारिया, ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया, विकास आघाडीचे अध्यक्ष गोविंद अग्रवाल, भारत सरोदे, फिरोज खान, नागेश वेल्लूरकर तसेच आघाडीचे नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.
नगरपालिकेत पहिले चार वर्ष आघाडीने नगरसेवक राजेश गायकवाड यांच्याकडे गटनेते पदाची जबाबदारी सोपविली होती. मात्र गेली एक वर्ष गायकवाड हे नगरपालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस गटामध्ये सामील होऊन आपल्याच गटाच्या विरोधात कार्यक्रम वाजवीत असल्याचे निदर्शनास येत होते. त्यामुळे कटारिया गट त्यांची या पदावरून उचलबांगडी करणार हे निश्चितच मानले जात होते. राजेश गायकवाड सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याच गटाच्या सदस्यांची मानहानी होईल अशा आशयाच्या पोस्ट प्रसारित करीत होते. या गोष्टींची त्यांना वारंवार तोंडी जाणीव देण्यात आली होती.
नगरपालिकेच्या सभागृहातील गायकवाड यांची विधाने पक्ष हितास बाधा आणणारी व सदस्यांच्या विरुद्ध वर्तन असणारी होती. त्यांची ही कृती महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनहर्ता अधिनियम 1987 चे उल्लंघन करणारी असल्याने गायकवाड यांना गटनेते पदावरून पाय उतार करण्यात आले असल्याचे बबलू कांबळे यांनी सांगितले.