दलालांनी हवेली तालुक्यातील सरकारी कार्यालये घेरली, महिला अधिकाऱ्यांना केले जात आहे ‘टार्गेट’

लोणी काळभोर : पुणे जिल्ह्यातील सरकारी कार्यालयांमध्ये सध्या दलालांचे राज्य पहायला मिळत आहे. कोणतेही काम असो हे दलाल न बोलवता मध्ये चोच मारत आहेत. याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांसह सरकारी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांनाही होत आहे.

या सुपारीबाज दलालांचा प्रत्यय सध्या हवेली तालुक्यातील विविध सरकारी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत असून हवेलीच्या तहसिल कार्यालयासह तालुक्यातील सर्व कार्यालयात काही सुपारीबाज दलालांची मुजोरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या दलालांनी महीला अधिकार्यांकडून बेकायदा कामे करुन घेण्यासाठी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दबावतंत्र वापरले जाऊन अनधिकृत कामे न करणार्या महीला अधिकार्यांना वयक्तीक स्वरूपात त्रास देण्याचे प्रकार वाढले आहे. या दलालांकडून तथ्यहीन आरोप करुन या अधिकारी, कर्मचाऱ्यांची बदनामी केली जात असल्याने अनेक महीला कर्मचारी माणसिक तणावाखाली गेल्या असल्याचे पुढे येत आहे.

त्यामुळे महसूल विभागात काम करणाऱ्या महीला अधिकार्यांच्या सुरक्षितते विषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हवेली तालुक्याच्या महसूल विभागात महीला अधिकार्यांच्यासह महीला कर्मचारी, तलाठी, मंडलाधिकारी यांची संख्या अधिक आहे मुलांच्या शैक्षणिक सुविधेसह सुरक्षिततेच्या दृष्टीने हवेली तालुक्यात महीला अधिक कामास प्राधान्य देतात. कामाचा ताण मोठ्या प्रमाणात असला तरी जादा वेळ देऊन कामे करतात. परंतु हवेली तालुक्यात सर्वाधिक कामे महसूलची असल्याने व मोठा आर्थिक फायदा असल्याने दलालांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात आहे. तालुक्यात महसूलच्या कामाचे एक गणित आहे. गाव पातळीवरील तलाठी कार्यालयातील कोतवाल यांना महसूल दप्तरातील खाचखळगे माहीत असते व शेतकरी या कोतवालांना कामे देऊन जलदगतीने करण्यासाठी जादा पैसे देतात हेच काही ठराविक कोतवाल या दलालांशी संगनमत करुन कामे देऊन मोठ्या रकमा घेतात. नियमबाह्य कामे अधिकारी किंवा कर्मचारी करत नसल्याने संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांची माहीती कोतवाल हे या दलालांना पुरवितात व या माहितीच्या आधारे वयक्तीक बदनामी, व चरित्रहनन व अर्थहीन आरोप करायचे व बदनामीच्या भितीपोटी नाईलाजाने कामे करावी लागतात याचाच गैरफायदा या दलालांनी घेऊन एक झाले की एक अशा अनेक महीला अधिकार्यांच्यासह महीला कर्मचारी टार्गेट केले आहे.

या अधिकार्यांच्या व कर्मचार्याच्या वरीष्ठांना खोट्या तक्रारी करण्याच्या धमक्या दिल्या जातात. तसेच बेकायदा प्लाॅटींगच्या नोंदीच्या कंत्राट प्लाॅटींग व्यवसायीकांकडुन घेऊन सातबारावर नोंदी करुन लाखो रुपयांचा मलीदा हे सर्व दलाल खात आहेत आणि पैसे घेतल्याचा आरोप मात्र महीला अधिकारी सहन करत आहेत. या सर्व बदनामीकारक दबावतंत्राला अनेक जण वैतागले आहेत. अधिकाऱ्यांनी एखाद्या फाईलवर सही केली नाही तर कार्यालयातच धमकी देण्याचे धाडसही हे दलाल करीत आहेत. या सर्व प्रकारातुन महीला कर्मचारी माणसिक धक्क्यात गेल्या असून त्यांचे मनोधैर्य खचले आहे. त्यामुळे या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोणी वालीच राहिला नाही अशी भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे या महीला कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आता राज्य महीला आयोगाने उभे रहावे अशी मागणी होत आहे.