मुंबई : सहकारनामा ऑनलाईन
गेल्या चार महिन्यांपासून कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे.
कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून जमावबंदी सारखे नियम कडक करण्यात आले आहेत. अशाच परिस्थितीमध्ये अनेक सण आले आणि गेले मात्र हे सण अतिशय नियोजन बध्द पद्धतीने घरातच साजरे झाले. तशाच प्रकारे येणारी बकरी ईदही साजरी करण्यात यावी असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम धर्मियांना केले आहे.
याबाबत बोलताना त्यांनी गेल्या ४ महिन्यांत आपण सर्व धर्मियांचे सण मर्यादित प्रमाणात साजरे केले, त्याचप्रमाणे येणारी बकरी ईद देखील साधेपणाने, जमल्यास प्रतिकात्मकरित्या आणि नियमांचे पालन करून साजरी करावी असे आवाहन करतो असे सांगितले.
सण आणि उत्सव हे जीवनाचा आनंद वाढविण्यासाठी असतात. आज एकीकडे कोरोनाची साथ झपाट्याने वाढते आहे, ती रोखण्याचे आटोकाट प्रयत्न आपण करीत आहोत आणि आपण त्याला साथ द्यावी असे शेवटी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले.