दौंड तालुक्यात खतांचा काळाबाजार, 7 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित..

अब्बास शेख

दौंड प्रतिनिधी : संपूर्ण जिल्हात खतांच्या साठ्याबाबत विशेष तपास मोहीम राबविण्यात आल्यानंतर आता खतांची साठेमारी करणाऱ्या दौंड तालुक्यातील ७ कृषी सेवा केंद्र आणि खत दुकानदारांचे परवाने निलंबित करुन त्याला टाळे ठोकण्याची कठोर कारवाई करण्यात आली आहे. या विक्रेत्यांच्या पॉस मशीनवर असलेल्या नोंदी आणि गोदामात असलेला प्रत्यक्ष खतांचा साठा यामध्ये मोठी तफावत आढळून आली आहे. खतांमधील ही अफरातफर अधिकाऱ्यांच्या छाप्यात उघड झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

दौंड तालुक्यातील केडगाव स्टेशन येथेही काही कृषी औषध दुकानदार बोगस औषधे, एक्स्पायर झालेली औषधे शेतकऱ्यांनी देत असल्याची गंभीर बाब शेतकऱ्यांच्या चर्चेतून पुढे येत असून त्यांच्यावर कारवाई कधी होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दौंड तालुका आणि अन्य तालुक्यांमध्ये करण्यात आलेल्या कारवाईची माहिती माध्यमांना देताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी सांगितले की, १ एप्रिलपासून संपूर्ण जिल्ह्यात युरिया खताच्या साठ्याची विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. या तपास मोहिमेदरम्यान तब्बल तीन हजार पाचशे टन युरियाचा साठा हा फक्त कागदावर असल्याचे मात्र तो या कृषी सेवांच्या गोदामात नसल्याचे आढळून आले. त्यामुळे या खतांचा साठा विक्री करूनही तो सिस्टीममधून कमी करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे खताच्या पुरवठा आणि नियोजनात मोठी अफरातफर होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते.

संपूर्ण जिल्ह्यात करण्यात आलेल्या कारवाईत सर्वाधिक कृषी सेवा केंद्रे ही दौंड तालुक्यातील असल्याचे कारवाई स्पष्ट झाले आहे. संपूर्ण जिल्ह्यात १५ दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले असून त्यापैकी ७ कृषी सेवा केंद्र हे दौंड तालुक्यातील आहेत ज्यांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत.

दौंड तालुक्यात परवाने निलंबित करण्यात आलेली कृषी सेवा केंद्रेअदिती कृषी सेवा केंद्र (लिंगाळी), बळीराजा ॲग्रो एजन्सी (देऊळगाव राजे), शिवकृपा ॲग्रो एजन्सी (पिंपळगाव), नंदाई ॲग्रो सर्व्हिसेस (नंदादेवी), बिरोबा कृषी सेवा केंद्र (बिरोबावाडी), श्रीराम कृषी भंडार (हिंगणी बेर्डे), श्रीनाथ ॲग्रो सर्व्हिसेस (राहू) अशी या कृषी सेवा केंद्रांची नावे आहेत.

कृषी विभागाचे आवाहन – कारवाई दरम्यान निलंबित करण्यात आलेल्या कृषी सेवा केंद्रांकडून निलंबनाच्या कालावधीदरम्यान कसल्याही प्रकारच्या खत खरेदी, विक्रीस सक्त मनाई करण्यात आली असून सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या कृषी सेवा केंद्रांकडून खते खरेदी करू नये आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.