भिमा पाटस कारखान्यासाठी ऊसतोड टोळी देतो म्हणून 3 लाख 87 हजारांची फसवणूक

दौंड : भिमा पाटस कारखान्यासाठी ऊसतोड मजुरांची टोळी देतो असे म्हणून टोळी मुकादमाने एकाजनाची 3लाख 87हजारांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबाबत नानासो विठठ्ल शेंडगे (वय 43, व्यवसाय शेती/ उस वाहतुक रा.वाटलुज ता.दौंड जि.पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी आरोपी  संजय गोरख बर्डे (रा. कुराणवाडी ता. राहुरी जि. अहमदनगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

दौंड पोलिसांनी दिलेल्या फिर्यादी हे शेती आणि भीमा सहकारी साखर कारखाना पाटस  येथे उस वाहतुकीचा व्यवसाय करतात. त्यांच्या गावात यापुर्वी संजय गोरख बर्डे (रा. कुराणवाडी ता. राहुरी जि. अहमदनगर) याने मागील दोन तिन वर्षांपूर्वी उस तोडणीचे काम केले होते. त्यामुळे फिर्यादि आणि आरोपी यांची चांगली ओळख होती. आरोपीला सध्या काम नसल्याने तो फिर्यादी यांना माझेकडे ऊस तोडीच्या 7 जोडया असुन तुम्हाला उस तोडणी करायची असल्यास मी आपल्याला टोळी जमवुन देतो असे म्हणाला. त्यामुळे फिर्यादी यांना भीमा साखर कारखाना पाटस  येथे सन 2023 या उस गळीत हंगामासाठी उस तोडणी करून वाहतुक करण्यासाठी संजय बर्डे याला कारखाना बंद होईपर्यंत 7 जोडया (7 पुरूष व 7 महीला मजुर) पुरवणेबाबत  उच्चल रक्कम प्रत्येकी 50 हजार रूपये देण्याचे ठरले व सामान आणण्यासाठी गाडीभाडे म्हणुन 37 हजार रुपये दिले.

त्यानंतर दिनांक 15/11/2023 रोजी सायं 6:00 वाजता वाटलुज येथे 7 जोड्या ऊसतोड कामगार आले. यावेळी फिर्यादी यांनी भिमा पाटस साखर कारखान्याचे गटप्रमुख दत्तात्रय शितोळे व साक्षीदार अतुल अशोक शेंडगे यांच्या समक्ष प्रत्येकी 50 हजार रूपये प्रमाणे  3लाख 87हजार रुपये दिले. मात्र दिनांक 16/11/2023 रोजी पहाटे 6:00 च्या सुमारास फिर्यादी हे वरील लोकांना ज्या ठिकाणी कॅम्प होता त्या ठिकाणी त्यांना कामावर घेवुन जाण्यासाठी गेले असता मुकादम संजय बर्डे व इतर 7 जोडया या कॅम्प ठिकाणी मिळुन आल्या नाहीत. त्यामुळे मुकादम आणि त्याने सोबत आणलेल्या सात जोड्या ह्या पैसे घेऊन आपल्याला फसवून पळून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी याबाबत दौंड पोलीस ठाण्यात फसवणूकीची फिर्याद दिली.