सहकारी साखर कारखानदारीला नवसंजीवनी मिळणार..! अमित शाहांच्या भेटी नंतर देवेंद्र फडणवीस यांची माहिती

नवी दिल्ली : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेत महाराष्ट्र राज्यातील साखर कारखान्यांच्या विविध प्रश्नांबाबत आज एक बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत
सहकारी साखर कारखानदारीला नवसंजीवनी मिळेल असे अनेक निर्णय त्यात घेण्यात आले आहेत अशी माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
एफआरपीपेक्षा अधिक पैसे देणार्‍या कारखान्यांच्या प्राप्तीकरासंदर्भातील काही प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा निघावा अशी प्रमुख मागणी या बैठकीत करण्यात आली होती. गेल्या 15-20 वर्षांपासून रेंगाळत असलेल्या या जुन्या प्रश्नावर सर्वांना दिलासा मिळावा अशी विनंती यावेळी करण्यात आली होती. त्यावर सकारात्मक कार्यवाही होईल असे आश्वासन केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी दिले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
इथेनॉल प्रकल्पाबाबत ऑईल कंपन्यांसोबत त्रिपक्षीय करार करून प्रश्न सोडविण्याची भूमिका सुद्धा केंद्र सरकारतर्फे घेण्यात आली, ही बाब महत्त्वाची आहे. कुठे दुष्काळ, कुठे अवकाळी आणि कोविडचा काळ यामुळे अनेक आर्थिक प्रश्न आहेत. त्यामुळे कर्जाच्या पुनर्गठनाबाबत सकारात्मक चर्चा झाली.
ज्या वर्षी मोठे उसाचे पीक आले आहे, त्यावर्षी कारखान्यांना कोणतीही अडचण होऊ नये आणि त्यातून कोणतेही नुकसान शेतकर्‍यांचे होऊ नये, यावरही विचार विनिमय होऊन राज्य सरकारचा दुजाभाव पाहता सर्वांसाठी पॅकेज तयार झाले पाहिजे, त्यातून सर्वांना समान संधी मिळतील, अशी मागणी फडणवीस यांच्याकडून करण्यात आली.

या बैठकीला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, पृथ्वीराज देशमुख, धनंजय महाडिक, रणजितसिंह मोहिते पाटील, मदन भोसले, दौंडचे आमदार राहुल कुल हे उपस्थित होते.