बिबट्याच्या हल्ल्यात 10 बोकड ठार, तर 9 जखमी



शिरूर : सहकारनामा ऑनलाईन

कोरोना विषाणूने लोकांना हैराण केले असताना आता जंगली श्वापदांकडूनही नागरी वसतींवर हल्ले होऊ लागल्याने नागरिकांमध्ये कमालीची घबराट पसरली आहे.

शिरूर तालुक्यात असणाऱ्या संविदणे या गावात एका शेतकऱ्याच्या शेळीपालन केंद्रावर  बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सुमारे 10 बोकड ठार झाले आहेत. विनायक नरवडे असे या शेतकऱ्याचे नाव असून त्याच्या शेळी पालन केंद्रावर  बिबट्याने रात्रीच्यावेळी हल्ला केला आहे. 

या हल्ल्यात 10 बोकड ठार झाले असून 9 बोकड जखमी झाले आहेत. या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचे 10 लाखाच्या पुढे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर

नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. याबाबत वन परीक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, वनरक्षक ऋषिकेश लाड वनकर्मचारी हनुमंत कारकुड, वनपाल चारूशिला काटे, पशु वैद्यकीय आधिकारी डॉ. गोरख सातकर, डॉ . प्रकाश ऊचाळे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. 

यावेळीशेतकऱ्यांनी वन विभागाने याबाबत त्वरित कारवाई करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून द्यावी तसेच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावावेत अशी मागणी केली आहे.