अब्बास शेख
केडगाव, दौंड : सध्या पत्रकारितेची क्रेझ आहे आणि प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे त्यामुळे आता जो तो स्वतःला पत्रकार समजू लागला आहे आणि नको त्या गोष्टी करु लागला आहे. पत्रकारिता काय आहे, तिची मूल्ये काय, लिखाण आणि माहिती कशी गोळा करतात, बातमी कशी लिहितात याची कोणतीही माहिती नसताना केवळ हातात मोबाईल घ्यायचा आणि एखादे कोणतेही नाव उचलून ते बूमवर चिटकावून पत्रकारितेच्या नावावर धुमाकुळ घालायचा असा नवा फंडा सध्या अनेकठिकाणी उदयास आला आहे. दौंड तालुक्यातील केडगाव, दापोडी या परिसरात सुद्धा असाच काहीसा प्रकार पहायला मिळाला असून गुऱ्हाळावर जाऊन तेथे तुमच्यावर कारवाई होईल, पोलिसांना फोन करतो, प्रदूषण विभागाला माहिती देतो, बातमी देतो..! अशी भीती दाखवत केडगाव-दापोडी परिसरातील गुऱ्हाळचालकांकडून एका कथित तोतया पत्रकाराकडून हप्ते मागितले जात असल्याचा गंभीर आरोप गुऱ्हाळचालकांनी केला आहे. याची क्लिप सध्या समाज माध्यमांवर फिरत असल्याने याला दुजोरा मिळत आहे.
सुरुवातीला महिन्याला मागितला जाणारा हप्ता पंधरा दिवसांवर आणि त्यानंतर थेट आठवड्यावर आल्याने या कथित ‘हप्ता वसुली’ला वैतागलेल्या गुऱ्हाळचालकांनी अखेर संबंधित व्यक्तीला जाब विचारत धारेवर धरल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. राज्यात प्रशासनाकडून नियमबाह्य गुऱ्हाळांवर धडक कारवाई सुरू असल्याने गुऱ्हाळचालकांमध्ये आधीच भीतीचे वातावरण आहे. याच परिस्थितीचा गैरफायदा घेतला जात असल्याचा आरोप आहे.
‘साखर आहे… प्लॅस्टिक जाळता… ड्रायर नाही!’
गुऱ्हाळावर तुम्ही साखर साठवून ठेवली आहे, प्लॅस्टिक जाळले जाते, चोत्री सुकविण्यासाठी ड्रायर नाही, अशा विविध कारणांचा उल्लेख करून संबंधित व्यक्ती ही आपण पत्रकार असल्याचे सांगत गुऱ्हाळावर जाऊन चालकांना कारवाईची भीती दाखवत असल्याचा आरोप गुऱ्हाळ चालकांनी केला आहे. विशेष म्हणजे स्वतःचा गुन्हा लपविण्यासाठी किंवा आपली बातमी येऊ नये म्हणून अनेकजण कोणतेही पुरावे, तथ्य नसताना पत्रकारांवर असे खोटे आरोप, खोटे अर्ज करत असतात मात्र या ठिकाणी जे घडले त्याचे संपूर्ण चित्रीकरण मोबाईलमध्ये करण्यात येऊन स्वतःला पत्रकार म्हणवणाऱ्या मात्र कोणत्या अधिकृत वृत्तपत्र अथवा टीव्ही न्यूज चॅनेलचा पत्रकार आहे हे न सांगणाऱ्या त्या व्यक्तीचे हावभाव हे संशयास्पद वाटत असल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले आहे.
या कथित तोतया पत्रकाराकडून ‘पैसे द्या, अन्यथा पोलिसांना आणि प्रदूषण विभागाला फोन करतो; तुमच्यावर कारवाई होईल,’ अशा प्रकारची दमदाटी केली जात असल्याचे काही गुऱ्हाळचालकांचे म्हणणे आहे. मात्र खरे पत्रकार हे जेथे चुकीचे घडते त्याची थेट बातमीच करत असतात, ते कोणत्याही भीतीले भीक घालत नाहीत आणि कुणाची वाटही पाहत नाहीत हा इतिहास आहे. मात्र प्रकार हा संशयास्पद असून कारवाईच्या भीतीने अनेक गुऱ्हाळ चालकांनी सुरुवातीला या तोतयाला पैसे दिल्याचे मात्र त्याची मागणी वाढतच गेल्याचे सांगितले जात आहे. खऱ्या पत्रकारांवर आरोप करणाऱ्यांची लाय डिटेक्टर चाचणी किंवा नार्को करण्याची मागणी सुद्धा खरे पत्रकार करतात.
महिन्याचा हप्ता… मग पंधरा दिवसांनी… आता आठवड्याला!
सुरुवातीला या तोतयाकडून महिन्याचा हप्ता मागितला जात होता. काही काळानंतर पंधरा दिवसांनी पैसे मागण्यास सुरुवात झाली. एवढ्यावरच न थांबता आता आठवड्याला हप्ता मागितला जात असल्याचा आरोप गुऱ्हाळचालकांनी केला आहे. ‘महिन्याचा हप्ता देऊनही पंधरा दिवसांनी पुन्हा पैसे मागितले जातात; आता आठवड्याची वेळ आली. हा प्रकार कुठे थांबणार?’ असा सवाल संतप्त गुऱ्हाळचालकांकडून उपस्थित केला जात आहे. गुऱ्हाळचालकांचा संयम अखेर सुटला!
वारंवार होणारी पैशांची मागणी आणि कारवाईची भीती यामुळे गुऱ्हाळचालकांमध्ये संताप वाढत होता. नुकतेच संबंधित व्यक्ती एका गुऱ्हाळावर गेल्यानंतर काही गुऱ्हाळचालकांनी त्याला जाब विचारला. अनेकांनी एकत्र येत त्याला धारेवर धरल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. परिस्थिती लक्षात आल्यानंतर संबंधित व्यक्तीने तेथून काढता पाय घेतल्याची माहिती गुऱ्हाळचालकांनी दिली.
या घटनेनंतर परिसरातील गुऱ्हाळचालकांमध्ये या कथित प्रकाराची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पत्रकार नव्हे तोतया गिरी..
पत्रकारितेच्या नावाखाली गुऱ्हाळचालकांकडून पैसे मागितले जात असतील तर हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. संबंधित व्यक्ती कोणत्या वृत्तपत्र अथवा माध्यमाशी संबंधित आहे? त्याच्याकडे अधिकृत पत्रकार ओळखपत्र आहे का? संबंधित माध्यम संस्थेला या प्रकाराची माहिती आहे का? या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे.
गुऱ्हाळामध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्यास पोलिस, महसूल प्रशासन किंवा प्रदूषण नियंत्रण विभागाने नियमानुसार तपासणी करून कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, बातमी न देता केवळ कारवाईच्या नावाखाली पैसे मागणे किंवा धमकावणे हा पत्रकारितेचा भाग होऊ शकत नाही.
प्रशासनाने चौकशी करण्याची मागणी
या कथित प्रकाराची पोलिस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करावी, संबंधित व्यक्ती खरोखर पत्रकार आहे की पत्रकारितेच्या नावाखाली वसुली करीत आहे, याची पडताळणी करावी, अशी मागणी गुऱ्हाळचालकांकडून होत आहे. तसेच ज्या गुऱ्हाळांमध्ये नियमांचे उल्लंघन होत आहे, त्यांच्यावरही संबंधित विभागांनी पारदर्शकपणे कायदेशीर कारवाई करावी. नियमांचे उल्लंघन असेल तर कारवाई कायद्याने व्हावी अशी भूमिका गुऱ्हाळचालकांनी व्यक्त केली आहे.
तोतया पत्रकारांमुळे खरे, निर्भीड पत्रकार बदनाम – अनेक ठिकाणी निर्भीडपणे लिखाण करणारे आणि बातम्या देणारे पत्रकार अश्या तोतया पत्रकारांमुळे बदनाम होताना दिसत आहेत. जो खरा आणि निर्भीड पत्रकार असतो तो गुप्तपणे माहिती घेऊन घडत असलेले चुकीचे कृत्य किंवा एखाद्या चुकीच्या गोष्टीचा थेट बातम्या देऊन भांडाफोड करत असतो. ज्याला बातमी द्यायची आहे तो एकदा पुरावा हाती आला की थेट बातम्या देतो आणि जगासमोर अश्या लोकांचे काळे कारनामे समोर आणतो मग जरी त्यावर खोटे आरोप झाले तरी ‘कर नाही त्याला डर कशाला’ या उक्तीप्रमाणे तो काम करत असतो आणि आरोपांवर लाय डिटेक्टर चाचणी किंवा नार्को चाचणीची मागणी करतो, त्यामुळे जरी त्याच्यावर सुद्धा सुद्बुद्धीने असे आरोप झाले तर त्याची खातरजमा पोलीस प्रशासन करुन ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ हे समोर येते. मात्र आपण पत्रकार आहोत हे सांगत फक्त स्पॉटवर जाऊन बातम्या न करता फक्त भीती दाखवणे आणि पैसे उकळणे हे लक्षण तोतयागिरीचे असून खरे पत्रकार असे कधी करत नाहीत त्यामुळे अश्या लोकांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.







