दौंड | प्रतिनिधी
दौंड–पुणे रेल्वे मार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी दिलासादायक घडामोड घडली असून, या मार्गावर ईएमयू (EMU) लोकल सेवा सुरू करण्यासंदर्भात केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत दिल्ली येथे झालेल्या बैठकीत दौंडचे आमदार ॲड. राहुल कुल यांनी विविध प्रलंबित रेल्वे प्रश्न मांडले. या बैठकीत रेल्वेमंत्र्यांनी ईएमयू लोकल सेवा सुरू करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने प्रवाशांच्या आशा उंचावल्या आहेत. या बैठकीस मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे उपस्थित होते.
आमदार राहुल कुल यांनी दौंड–पुणे रेल्वे कॉरिडॉरवरील प्रश्न यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना पत्र पाठवून या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याची शिफारस केली होती. त्याच अनुषंगाने दिल्ली येथे ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
बैठकीत मांडलेल्या प्रमुख मागण्या
सध्या धावणाऱ्या DEMU/MEMU गाड्यांऐवजी वेगवान EMU लोकल सेवा तातडीने सुरू करावी.
महिला, दिव्यांग आणि फर्स्ट क्लास प्रवाशांसाठी स्वतंत्र डब्यांची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
गाड्यांमध्ये वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांवर कायमस्वरूपी उपाययोजना करून सेवा अधिक विश्वासार्ह करावी.
सकाळी ६.०० वाजता दौंडवरून सुटणारी DEMU गाडी हडपसरऐवजी थेट पुणे जंक्शनपर्यंत चालवावी.
सकाळी व संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत अतिरिक्त फेऱ्या सुरू कराव्यात.
सकाळी ८.२० ते दुपारी ५.०० या वेळेत नवीन गाड्या सुरू कराव्यात.
दौंड येथील इलेक्ट्रिक लोको शेडचे काम तातडीने पूर्ण करावे.
रेल्वेमंत्र्यांचे सकारात्मक आश्वासन
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सर्व मागण्या गांभीर्याने ऐकून घेत दौंड–पुणे मार्गावरील इलेक्ट्रिक लोको शेडचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच, या मार्गावर ईएमयू (EMU) लोकल सेवा सुरू करण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
आमदार राहुल कुल यांची प्रतिक्रिया
“दौंड–पुणे रेल्वे कॉरिडॉर हा या भागाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाचा कणा आहे. प्रवाशांच्या समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या सकारात्मक आश्वासनामुळे लवकरच दौंडकरांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुखकर होईल,” असे आमदार ॲड. राहुल कुल यांनी सांगितले.
ईएमयू लोकल सेवा सुरू झाल्यास दौंड, केडगाव, उरुळी कांचन, लोणी काळभोर, हडपसर आणि पुणे या मार्गावरील लाखो नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे. त्यामुळे या निर्णयाकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.







