पुणे | प्रतिनिधी
खडकवासला धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे आज (दि. २९ जुलै २०२६) सकाळी ६ वाजल्यापासून धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.

खडकवासला पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी सुरू असलेला ३,४२४ क्युसेक विसर्ग वाढवून ४,७०८ क्युसेक करण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण आणि धरणात होणारी आवक लक्षात घेऊन हा विसर्ग पुढील काळात कमी किंवा अधिक केला जाऊ शकतो, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

प्रशासनाने नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन केले असून कोणत्याही परिस्थितीत मुठा नदीपात्रात उतरू नये, असे सांगितले आहे. तसेच नदीपात्रात असलेले साहित्य, वाहने किंवा जनावरे तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावीत. सखल भागातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही सूचना खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी जारी केली असून, संभाव्य धोका टाळण्यासाठी सर्व संबंधितांनी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.








