दौंड : वरवंड येथील मुख्य बाजारपेठेत मंगळवारी मध्यरात्री भीषण आग लागून व्यवसायिकांची तीन दुकाने आणि एक छोटा मालवाहू टेम्पो पूर्णपणे जळून खाक झाला. या आगीत लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास बाजारपेठेतील एका दुकानातून धूर आणि ज्वाळा दिसू लागल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. काही वेळातच आग शेजारील दुकानांमध्ये पसरली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाने आणि स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर काही तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

या दुर्घटनेत तीन व्यापाऱ्यांची दुकाने, त्यामधील मोठ्या प्रमाणावरील मालसाठा तसेच एक छोटा मालवाहू टेम्पो जळून खाक झाला. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, शॉर्टसर्किटची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित यंत्रणेकडून पंचनामा आणि पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे वरवंड बाजारपेठेतील व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.









