दौंड : आमदार राहुल कुल यांना राजकीय द्वेषातून ठरवून बदनाम करण्याचे कटकारस्थान रचले गेले होते हे आता उघड होऊ लागले आहे. काही व्यक्तींच्या भावनेशी खेळून, वेळ पाहून त्यांना कुल हेच या प्रकरणाला जबाबदार आहेत असे त्यांच्या मनावर बिंबवून ते या प्रकरणात या ना त्या प्रकारे कसे कुलांचे नाव घेतील याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला होता हे आता लपून राहिलेले नाही. या सर्व प्रकारामागे एक राजकीय टोळी कार्यरत असून ती ठरवून हे सर्व करत होती अशी माहितीही आता हळू हळू बाहेर येऊ लागली आहे.
भिगवण येथील घडलेल्या घटनेचा सर्वच स्तरांतून निषेध व्यक्त केला जात असताना काहींनी यावर राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी दौंडचे आमदार राहुल कुल यांचे नाव या प्रकरणाशी जोडत थेट 2029 ची विधानसभा डोळ्यासमोर ठेवल्याचे त्यांच्या सोशल मीडियावरील विविध पोस्ट आणि कमेंट ने दिसत आहे. त्यामुळे पिडीत कुटुंब आणि त्यांच्या समाजाला राहुल कुल यांच्यापासून दूर करण्यासाठीच हा मोठा खटाटोप करण्यात येउन शांत डोक्याने हे मोठे षडयंत्र रचण्यात आले होते अशी चर्चा आता दोन्ही तालुक्यांमध्ये होताना दिसत आहे.
आमदार, जनता आणि कार्यकर्ते – ज्यावेळी एखादी व्यक्ती मोठ्या पदावर विराजमान होते, आमदार होते त्यावेळी त्यांच्या आजूबाजूला कायम विविध गावांचे सरपंच, सदस्य, संचालक, सर्वसामान्य नागरिक हे आपल्या अडचणी घेऊन येत असतात. अश्यावेळी कोणतेही पत्र देताना, काम झाल्याबद्दल अभिनंदन करताना किंवा गावात आल्यानंतर तेथील विविध योजना, समस्यांची पाहणी करताना फोटो काढले जातात ही सामान्य बाब आहे. मात्र एखादी घटना घडली कि ते फोटो वापरून अमुक व्यक्तीला आमदारांचा सपोर्ट आहे. त्या घटनेत त्यांनी मदत केली असेल असे मुद्दाम बिंबवले जाते आणि यातून राजकीय पोळी भाजून घेतली जाते हेही तितकेच खरे.
दंगल घडवणाऱ्यांना वेळीच रोखल्याने कुलांवर मोठा रोष – प्रत्येक जाती धर्मात पाच दहा टक्के विकृत मानसिकतेचे काही महाभाग असतात ज्यांना सामाजिक एकोपा, विकास आणि सर्व सुरळीत चाललेले पहावत नाही मग त्यातून ते विविध जाती आणि धर्मांमध्ये भांडणे कशी लावता येतील, दंगली कशा होतील आणि यात मी हिरो, मसीहा म्हणून कसा पुढे येईल यासाठी कायम प्रयत्न करत असतात. मीच माझ्या जाती, धर्माचा ठेकेदार. सर्वांनी मी म्हणतो तसे वागले पाहिजे आणि तसेच आचरण केले पाहीजे हा अट्टाहास अनेकांना विकृत चाळे करायला भाग पाडतो आणि मग जो यामध्ये अडसर ठरेल त्याला बदनाम करुन कश्या पद्धतीने लोकांच्या नजरेतून पाडले जाईल याचा पुरेपूर प्रयत्न कायमच होत राहतो. भिगवण प्रकरणात आमदार राहुल कुल यांच्यासोबत नेमके हेच केले गेले मात्र सुज्ञ जनतेने आणि समाजाने हे षडयंत्र वेळीच ओळखल्याने याची धार जास्त काळ टिकली नाही.
मिडिया ट्रायल घेत बदनामीचा प्रयत्न – सोशल मिडियावर कायम वादग्रस्त असलेल्या काही स्वयंघोषित चॅनेल्सने सुरुवातीपासूनच आमदार राहुल कुल यांचे नाव या प्रकरणात कसे येईल याचा पुरेपूर प्रयत्न केल्याचे आणि याबाबत त्यांनी मिडिया ट्रायल घेतल्याचे दिसत आहे. कारण ज्यावेळी काही भाषणे होत होती त्यावेळी यातील काहीजण मुद्दाम कुलांचे नाव घेताना दिसत होते तर जो कुलांचे नाव घ्यायला विरोध करेल तो लाभार्थी, ठेकेदार, गुलाम असे म्हणून त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला. विधानसभा निवडणुकीला अजून तब्बल साडेतीन, चार वर्षे बाकी असताना केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी आणि तालुक्याला अस्थिर करण्यासाठी आमदार राहुल कुल यांच्यावर अतिशय योजनाबद्ध पद्धतीने मिडिया ट्रायल चालवून एका ठराविक समाजाला त्यांच्यापासून अलिप्त करण्यासाठी त्यांच्या मनात राहुल कुल यांची विलन अशी प्रतिमा बिंबविण्याचा आटोकाट प्रयत्न केला गेला. मात्र ज्यावेळी सत्य समोर आले त्यावेळी मात्र मेनस्ट्रीम मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी त्याला बगल देण्याचे काम राजकीय आकस ठेवून आरोप करणाऱ्यांनी केल्याचे दिसले.
सामाजिक बांधिलकी, दहशत मुक्त दौंड आणि विकास कुणाच्या डोळ्यात खुपत आहे – दौंड तालुक्यात एकेकाळी कोणाची दहशत होती आणि लोकांना घरातून उचलून घेऊन कसे गायब केले जायचे हे अजूनही दौंडचे लोक विसरलेले नाहीत. दौंड तालुका हा कायम गुंड आणि लुटारुंच्या दडपणाखाली असायचा हे सर्वांना चांगलेच माहित आहे मात्र आमदार राहुल कुल हे अण्णांच्या आकास्मिक जाण्यामुळे राजकारणात आले आणि त्यांनी ही दहशत मोडून काढली याचा राग आजही अनेकांना आहे. गुंडगिरी, दादागिरी आणि लोकांच्या जमिनी लुबाडणाऱ्यांना वेळीच पोलीस खाक्याची जरब बसून या तालुक्यातील दहशत संपून शांतता नांदू लागली आणि ज्यांना दहशतीच्या जोरावर सर्व पाहिजे होते ती स्वप्ने धुळीस मिळाली. त्यामुळे सध्या घडत असलेल्या सर्व प्रकारामागे काही राजकीय अतृप्त आत्मे हे आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी आपल्या बगलबच्च्यांना एक टास्क देत आहेत आपल्याला जसे हवे तसे दाखविण्यासाठी लिखाणाची अक्कल नसताना आणि पत्रकारितेतला प सुद्धा माहित नसताना त्यांना मिडियावाले असे दाखवून कुल यांची मिडिया ट्रायल घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रकर्षाने जानवत आहे.






