मुंबई : पश्चिम महाराष्ट्रात, विशेषतः पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढलेल्या बिबट्यांच्या वावरामुळे शेतकरी आणि नागरिक प्रचंड दहशतीत आहेत. या गंभीर परिस्थितीवर तातडीने उपाययोजना कराव्यात आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना रात्रीऐवजी दिवसा वीज पुरवठा करावा, अशी आग्रही मागणी आमदार राहुल कुल यांनी आज विधानसभेत ‘औचित्याच्या मुद्या’द्वारे केली.
आमदार राहुल कुल यांनी सभागृहाचे लक्ष वेधताना सांगितले की, पुणे जिल्ह्याच्या विविध भागांत बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. शेतात कामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांवर बिबट्यांचे हल्ले होत असून, यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. शासनाने यावर उपाययोजना करण्याचे निश्चित केले असले तरी, त्याची अंमलबजावणी अत्यंत वेगाने होणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरण्यासाठी जाताना बिबट्यांचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जिवाचे रक्षण करण्यासाठी वीज वितरण कंपनीने दिवसा वीज पुरवठा करावा.
बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने पिंजरे लावणे, गस्त घालणे आणि इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी विनंती त्यांनी माननीय मुख्यमंत्री आणि वनमंत्री यांच्याकडे केली. शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या आणि हक्काच्या प्रश्नावर शासन सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास आमदार राहुल कुल यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्य सरकारने सामान्य शेतकऱ्यांच्या वीज बिलात सवलत किंवा माफी दिली आहे. मात्र, ग्रामीण भागातील जे छोटे शेतकरी एकत्र येऊन ‘सहकारी वीज संस्थांच्या’ माध्यमातून शेतीपंपाच्यासाठी वीज घेतात, त्यांना अद्याप ही सवलत मिळालेली नाही. हा शेतकरी अत्यंत लहान घटक असून, त्यांनाही वीज बिलातून माफी किंवा सवलत मिळावी, असा महत्त्वपूर्ण मुद्दा आमदार कुल यांनी मांडला.






