जर माझे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, तर त्यावेळी देवेन्द्र फडणवीस गप्पा का होते.. : नवाब मलिक, अजित पवार आणि अनिल देशमुख यांच्याबाबतही केले हे विधान

मुंबई : राज्यात सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी धुमाकूळ घातला आहे. अगोदर समीर वानखेडे – नवाब मलिक वाद सुरू होता आता नवाब मलिक – देवेंद्र फडणवीस असा वाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
काल अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर नवाब मलिक यांनी यांनी केलेल्या आरोपांनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन हे महिलांवर आरोप करतात हे चुकीचे असल्याचे म्हणत नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत आणि ते आम्ही उघड करणार आहोत, सोडणार नाही असा इशारा दिला होता. आज मंत्री नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेऊन त्यास प्रत्युत्तर दिले आहे.

मी मुंबईत जवळपास 60-62 वर्षांपासून राहतोय, या काळात सर्वांना माहीत आहे की मी कसा आहे. त्यामुळे कुणीही येऊन सांगावे अथवा माझे अंडरवर्ल्डशी संबंध होते किंवा आहेत हे सिद्ध करावं, असे आवाहन नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवी यांना करतानाच जर माझे अंडरवर्ल्डशी संबंध होते, तर फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना गृहखातं सुद्धा त्यांच्याकडेच होतं, मग त्यावेळी त्यांनी माझ्यावर कारवाई का केली नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. आणि मी काय आणि कोणते आरोप करतोय हे मला माहीत असतानाही मी एकमेव असा व्यक्ती आहे, ज्याने माजी मुख्यमंत्र्यांवर आणि त्यांच्या सरकारवर प्रश्न उपस्थित केलेले आहेत असे त्यांनी सांगितले.


महिलांवरील आरोपांबाबत बोलताना त्यांनी मी महिलांवर आरोप करतो असा आरोप माझ्यावर केला जात आहे मात्र 25 दिवसांत मी 2 महिलांव्यतिरिक्त इतर कुणाच नाव घेतल नाही. आणि ज्या 2 महिलांची नवे घेतली आहेत त्या 2 महिलांचे त्या प्रकरणाशी संबंध आहे म्हणूनच त्यांचा उल्लेख मी केला आहे असे त्यांनी म्हटले आहे.


हे लोक दुसऱ्यांच्या आया-बहिणी महिलांवर बेछूट आरोप करतात हे यांना दिसत नाही का, असा सवाल उपस्थित करून त्यांनी किरीट सोमय्या यांनी जे काल अजित पवारांच्या आई, बहिणीचा उल्लेख केला याचा हवाला दिला. तसेच याअगोदार संजय राऊत, एकनाथराव खडसे यांच्या पत्नींबद्दल जी विधाने या लोकांनी केली त्याबाबत मात्र कुणी काही बोलत नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे. समीर वानखेडे यांच्यावर जे मी आरोप केले होते त्यातील सत्यता आता बाहेर पडत असून आर्यन खान केसमध्ये 18 कोटींची डील होऊन यातील 8 कोटी समीर वानखेडे यांना मिळणार होते हे सिद्ध होईल आणि यातील दोषींवर कारवाई होईल असेही त्यांनी म्हटले आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत बोलताना त्यांनी हे सर्व खोटे असून त्यांना मुद्दाम फसवले जात असल्याचे सांगत ज्यांनी त्यांच्यावर आरोप केले ते परमबीर सिंग कुठे आहेत आणि आता समोर का येत नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तर अजित पवारांवर करण्यात आलेल्या बेनामी संपत्तीचा किरीट सोमय्या यांनी जो काल आरोप केला आहे तो त्यांनी दुसऱ्याची संपत्ती अजित पवारांची आहे असे म्हणून कसे चालेल असे म्हणत याबाबत लवकरच सत्य काय समोर येईल असे सांगितले.