रियाज भाटी आरोपी असताना पंतप्रधानांच्या कार्यक्रमापर्यंत कसा पोहोचला, 14 कोटींच्या त्या बनावट नोटांमागे कोण ?? : नवाब मलिक यांचा देवेंद्र फडणवीसांवर आरोप

मुंबई : एनसीबी ड्रग्ज प्रकरणाची लढाई आता नुसती समीर वानखेडे विरुद्ध नवाब मलिक अशी राहिली नसून यात आता महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी वळली आहे.
अगोदर मलिक यांनी फडणवीस व अमृता फडणवीस यांनी गायलेल्या गाण्याच्या अल्बममध्ये ड्रग्ज पेडलरने फंडिंग केल्याचे समोर आणले होते. त्यानंतर काल देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मलिकांवर मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींकडून जागा खरेदी केल्याचा गंभीर आरोप करत मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे म्हटले होते. आज नवाब मलिक यांनी पत्रकारपरिषद घेऊन देवेंद्र फडणवीस आणि रियाज भाटी, मुन्ना यादव यांच्याबाबत गौपयस्फोट केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी रियाज भाटी हा कोण आहे याचे उत्तर द्यावे आणि तो बोगस पासपोर्ट सोबत सापडला होता, त्याचे संबंध दाऊदशी होते तो सर्व कार्यक्रमांमध्ये तुमच्या डिनर टेबलवर का असायचा, त्यावर गंभीर आरोप असताना तो येथील एका कार्यक्रमात पंतप्रधानांच्या जवळ कसा जातो याचे उत्तर द्यावे असा हल्ला मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर चढवला आहे.
फडणवीस यांनी क्रिमिनल लोक आपल्याजवळ घेतले आहेत. त्यामुळे भाजपची राज्यात सत्ता असताना बनावट पासपोर्ट बाळगणारा, अंडरवर्ल्डचे संबंध असणारा रियाज भाटी हा दोन दिवसात कसा सुटला, 14 कोटी 56 लाख रुपयांच्या बनावट नोटा पकडून त्या 8 लाख 80 हजार दाखविल्या असा आरोप करत त्यावेळी या सर्व प्रकरणात जो अधिकारी काम पाहत होता तो योगायोगाने समीर वानखेडेच होता हे विशेष आहे असे मलिक यांनी म्हटले आहे.
ज्याच्यावर दाऊद इब्राहिमच्या संपर्काचे आरोप आहेत तो इतक्या मोठ्या कार्यक्रमात काय करत होता. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना गुंडांना अतिशय महत्त्वाच्या पदांवर बसवले असा आरोप नवाब मलिकांनी करताना हत्येचा आरोप असलेल्या मुन्ना यादवला फडणवीसांनी बांधकाम कामगार मंडळावर अध्यक्ष केले, हैदर आझम बांगलादेशी लोकांना मुंबईत वसवण्याचं काम करतो, त्याच्या दुसऱ्या पत्नीवर खोट्या कागदपत्रांबाबत गुन्हा दाखल होत असतांना फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यालयातून फोन का गेला होता आणि त्यानंतर ते प्रकरण कसे थांबले याबाबतही मलिक यांनी फडणवीस यांना सवाल केला आहे.
रियाज भाटीच्या आणि भावाला महामंडळाचे चेअरमन बनवले, एकाला अल्पसंख्याक आयोगचे अध्यक्ष करण्यात आले यावरून हे लोक फडणवीस यांच्यासोबत काम करत असल्याचे समोर येत आहे असा आरोप नवाब मलिक यांनी आपल्या पत्रकार परिषद मध्ये केला आहे.