वारणा धरणातून कोणत्याही क्षणी विसर्ग ! 80 टक्के धरण भरल्याने कृष्णा काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

सांगली : वारणा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सुरु असलेल्या संततधार पावसाने वारणा धरणामध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरु असून सध्या धरण पायथा विद्युत गृहातून ८९० क्युसेक्स ने पाणी वीजनिर्मिती करून नदीपात्रात सोडले जात आहे. सध्या धरण ८० टक्के भरल्याने कोणत्याही क्षणी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु होण्याची शक्यता असल्याचे धरण व्यवस्थापनाने स्पष्ट केले.

सध्या बारा हजार तीनशे नव्वद ने वारणा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक होत आहे मात्र पावसाचा जोर कायम असल्याने धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी वाढण्याची शक्यता असून नदीकाठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आज जरी तालुक्यात पावसाचा जोर कमी असला तरी कोकरूड रेठरे हा बंधारा अद्याप पाण्याखाली आहे त्यामुळे वाहतूक ठप्प आहे तर मांगले सावर्डे हा बंधारा वाहतुकीसाठी खुला झाला आहे वारणा नदी अद्यापही पात्राबाहेर आहे आजूबाजूच्या शेतांमध्ये पाणी शिरले आहे वारणा धरणात सध्या २७.२३ टी एम सी पाणीसाठा झाला आहे तर उपयुक्त पाणीसाठा २०.२३ टी एम सी इतका झाला आहे.

कोकरूड आणि शिराळा पोलीस ठाण्यामार्फत खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठावरील गावांमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सांगली जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे या संभाव्य पूरपरिस्थिती उद्भवणाऱ्या क्षेत्रांना भेट देण्यासाठी आज सकाळ पासून त्या ऑन फिल्ड दिसून आल्या कालच त्यांनी सी ई ओ पदाचा कार्यभार स्वीकारला आहे तर आज लागलीच त्यांनी आपल्या कामास सुरुवात केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.